विशेष प्रतिनिधी
नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्याच अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांना मोदी सरकारने भरभरून दान दिले, पण महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही आले नाही, असे नॅरेटिव्ह काही मराठी माध्यमांनी चालविले आहे. पण युवकांना रोजगार, गरीब कल्याण तसेच विविध उद्योगांसाठीच्या भरघोस तरतुदी यामुळे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. Union Budget 2024 Criticism that Maharashtra has nothing in the budget
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरूण, रोजगार यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
पण मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात विदर्भ अन् महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही आले नसल्याचा दावा काही मराठी माध्यमांनी केला. प्रत्यक्षात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. उद्योग क्षेत्रासाठी अनेक योजना या अर्थसंकल्पात आहेत आणि औद्योगिक राज्य म्हणून त्याचा निश्चित फायदा महाराष्ट्राला मिळेल, असे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आणि विदर्भासाठी नामोल्लख करून या अर्थसंकल्पात काही मिळाले असते, तर नक्कीच त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला झाला असता. मात्र, उद्योग क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरपूर काही देण्यात आल्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला नक्कीच त्याचा फायदा होईल, असे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने म्हटले आहे. सोबतच तरुणांचा कौशल्य वाढवण्यासाठी, तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या योजना ही जाहीर करण्यात आल्यामुळे त्याचा ही मोठा फायदा उद्योग क्षेत्राला होईल, असेही विशाल अग्रवाल म्हणाले.
रियल स्टेट क्षेत्रात महिलांना प्राधान्य
हा अर्थसंकल्प महिलांसाठी आणि खास करून महिला उद्योजिकांसाठी विशेष फायद्याचा असल्याचे मत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या महिला उद्योजिका शाखेच्या अध्यक्ष रश्मी कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आजच्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटींची विशेष तरतूद तर करण्यात आलीच आहे, शिवाय महिलांच्या नावाने संपत्तीची खरीद केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये विशेष सूट देण्यात आल्याने रियल स्टेट क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन आणि प्राधान्य मिळेल, असे कुलकर्णी म्हणाल्या. शिवाय स्टार्ट अप मधील गुंतवणुकीवरील एंजल टॅक्स रद्द केल्यामुळे स्टार्ट अप व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना त्याचा विशेष फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App