नाशिक : लोकसभेची निवडणूक होऊन 99 खासदार मिळालेल्या काँग्रेसला हुरूप चढून अवघे सहा महिने होत नाहीत, तोच INDI आघाडीत राहुल गांधींच्या नेतृत्वाला ग्रहण लागले. ममता बॅनर्जींचे नेतृत्व पुढे सरकले, पण त्या पलीकडे जाऊन कधीकाळी म्हणजे 2021 मध्ये UPA चे चेअरमन व्हायला निघालेल्या शरद पवारांचे नेतृत्व INDI आघाडीत ममता बॅनर्जी यांच्यापुढे देखील फिके पडत चालले. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींनी राहुल आणि पवारांच्या नेतृत्वाला असा काही दणका दिला की त्यांचे रेटिंग एकदम खाली आले. Sharad Pawar
2019 च्या निवडणुकीमध्ये त्यावेळच्या युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स म्हणजेच UPA मध्ये अशीच निराशेची मरगळ पसरली होती. कारण भाजपला 303 खासदार निवडून आणता आले होते, तर काँग्रेस 44 वरून फक्त 54 वर पोहोचू शकली होती. त्यावेळी नेहमीप्रमाणे शरद पवारांनी काँग्रेसवर एक “डाव” टाकून पाहिला होता, तो डाव अर्थातच पवारांनी आपल्या स्टाईलनुसार वेगळ्या माणसाच्या तोंडून बाहेर आणला होता, ते म्हणजे संजय राऊत.
भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला तोंड द्यायचे असेल, तर UPA अध्यक्षपदी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची निवड करा, अशी सूचना स्वतः पवारांनीच 2021 मध्ये संजय राऊत यांच्या तोंडून वदवून घेतली होती. केंद्रीय राजकारणात पुन्हा मुसंडी मारण्याचा पवारांचा तो “डाव” होता. त्यावेळी राहुल गांधींचे नेतृत्व काँग्रेसने एवढे पुढे आणले नव्हते. UPA च्या प्रमुखपदी सोनिया गांधीच होत्या. त्यामुळे संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सोनिया गांधींनाच बाजूला करून शरद पवारांना UPA च्या अध्यक्षपदी नेमायची सूचना केली होती.
पण त्या वेळच्या UPA आघाडीतल्या कुठल्याच घटक पक्षांनी फार उत्साहाने संजय राऊत यांच्या सूचनेला पाठिंबा दिला नव्हता. पवारांच्या UPA अध्यक्ष बनायच्या आयडियेला अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन वगैरे नेत्यांनी फारसे महत्त्व दिले नव्हते. पवारांची ज्येष्ठता सगळ्यांना मान्य होती, पण त्यांचे नेतृत्व स्वीकारायला फारसे कोणी उत्सुक नव्हते. त्यामुळे पवारांच्या UPA अध्यक्षपदाची चर्चा काही दिवसांतच दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून मावळून गेली होती.
2021 च्या पवारांच्या UPA अध्यक्ष बनवायच्या सूचनेच्या तुलनेत 2024 मध्ये ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या INDI आघाडीच्या प्रमुख पदाच्या सूचनेला मात्र सगळ्या विरोधकांनी भरघोस पाठिंबा दिल्याचे दिसले. स्वतः शरद पवार, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव वगैरे नेते थेट ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभे राहून मोकळे झाले.
राहुल गांधी काँग्रेसच्या 99 खासदारांसह विरोधी पक्षनेते झाले. त्यामुळे आपोआपच INDI आघाडीचे संसदेतले नेतृत्व त्यांच्याकडे गेले. त्यामुळे INDI आघाडीतल्या नेत्यांमध्ये तशी खदखद वाढलीच होती. पण ती व्यक्त करायला “मोकळी जागा” किंवा वाव मिळत नव्हता, ही “मोकळी जागा” हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाने करून दिली. ती संधी ममता बॅनर्जी यांनी चटकन उचलली. अचूक राजकीय टाइमिंग साधून INDI आघाडीचे नेतृत्व करायची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. त्यांच्या इच्छेला काँग्रेस सोडून बाकी सगळ्या प्रमुख पुढार्यांनी पाठिंबा देऊन टाकला.
इथे ममता बॅनर्जी या शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पण भारी ठरल्या. पवारांना 2021 दिल्लीत बसून देखील मध्ये UPA अध्यक्ष पद मिळवायच्या स्पर्धेत जेवढा पाठिंबा मिळू शकला नव्हता, किंबहुना ते मिळवू शकले नव्हते, त्यापेक्षा जास्त पाठिंबा ममता बॅनर्जींनी 2024 मध्ये कोलकत्यात बसून मिळवून दाखविला. ममता बॅनर्जींसारख्या ज्युनिअर नेत्यापुढे सीनियर पवारांचे नेतृत्व असे फिके पडले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App