विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेल्या राहुल गांधी आणि काँग्रेस यांना देशातल्या बुद्धिजींनी मोदी विरोधात पाठिंब्याचे बळ दिले आहे. तुषार गांधी यांच्या पाठोपाठ मणिशंकर अय्यर, इरफान हबीब, प्रकाश राज यांच्यासह देशातले बुद्धिजीवी, प्राध्यापक, लिबरल राजकीय – सामाजिक कार्यकर्ते अशा सुमारे 1000 जणांनी राहुल गांधींना पत्र लिहून त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे.Savarkar – modi insult issue : tushar Gandhi, mani shankar ayer, irfan habib and 1000 liberals wrote a letter of support rahul Gandhi
देशातली लोकशाही वाचवण्यासाठी या देशातले प्रत्येक घर तुमचे आहे, अशा आशयाचे ट्विट अभिनेते प्रकाश राज यांनी केले आहे, तसेच राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केलेला नाही. सावरकरांच्या बाबतीतही ऐतिहासिक तथ्यच मांडले आहे. राहुल गांधींनी माफी मागू नये, अशी मुलाखत महात्मा गांधींचे पण तुषार गांधी यांनी दिव्य मराठीला दिली आहे. तशाच आशयाचे पत्र देशातल्या बुद्धिजीवी विचारवंत प्राध्यापक, लिबरल राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना लिहिले आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राजकीय चलाखीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलले असताना देशातले बुद्धिजीवी विचारवंत राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहून सावरकर आणि मोदींच्या अपमानाचा मुद्दा पुन्हा तापवत आहेत. राहुल गांधींनी देशातल्या सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?, असा सवाल करून मोदी समाजाचा अपमान केला होता. त्यावरून सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले. त्यांना कोर्टाने माफी मागण्याची मुभा दिली होती. परंतु त्यांनी माफी मागितली नाही. त्या उलट आपण राहुल सावरकर नाही. राहुल गांधी आहोत, अशी मखलाशी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत केली होती. त्यावरूनच ते राजकीयदृष्ट्या पूर्ण अडचणीत आले होते. उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांना दिला होता.
मात्र, त्याच वेळी मोदी विरोधात आघाडी उघडण्याच्या दृष्टीने राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी आक्रमक हालचाली केल्या. राहुल गांधींना खासदारकीबरोबर त्यांचे सरकारी निवासस्थान देखील गमवावे लागले आहे. याच मुद्द्यावरून आता तुषार गांधी, इरफान हबीब, मणिशंकर अय्यर यांच्यासह सुमारे 1000 विचारवंत बुद्धिजीवी राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहिले आहेत. राहुल गांधींना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
मोदी सरकारने राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे. ही कारवाई लोकशाहीच्या विरोधात आहे. अशा प्रकारच्या अनेक कारवाया करून मोदी सरकारने लोकशाही धोक्यात आणून हुकूमशाही कडे वाटचाल सुरू केली आहे, असे शरसंधान या विचारवंतांनी पत्रामधून साधले आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद, कवि आणि वैज्ञानिक गौहर रजा, सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमी, निर्माता शरद राज, माजी मंत्री यशवंत सिन्हा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर, इतिहासाचे अभ्यासक इरफान हबीब यांची नावे या पत्रात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App