विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे अभिनंदन केले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी यासंदर्भात निवेदन जारी केले असून ते संघाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे.
ते असे :
पहलगाम येथे निशःस्त्र हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि आपल्या सशस्त्र दलांनी “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तान प्रेरित दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या पाठीराख्या यंत्रणेवर घेतलेल्या धाडसी कारवाईबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. या निर्दयी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळावा या हेतूने करण्यात आलेली ही कारवाई देशाच्या आत्मसन्मानात आणि जनतेच्या मनोधैर्यात लक्षणीय वाढ करणारी आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि यंत्रणेवर लष्करी कारवाई करणे आवश्यक व अपरिहार्य आहे, याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. या राष्ट्रीय संकटाच्या काळात संपूर्ण देश सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी एकदिलाने उभा आहे.
पाकिस्तानच्या सैन्याकडून भारताच्या सीमावर्ती भागातील धार्मिक स्थळांवर आणि नागरी वसाहतींवर होत असलेल्या हल्ल्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, तसेच या क्रूर आणि अमानवी हल्ल्यांतील बळींच्या कुटुंबियांप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
या कठीण काळात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व नागरिकांना सरकार आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन करतो. यासोबतच, आपले पवित्र नागरी कर्तव्य बजावताना आपण सावध राहिले पाहिजे आणि समाजातील एकता व सलोखा भंग करण्याचा कोणत्याही देशविघातक शक्तींचा कट यशस्वी होऊ देऊ नये.
सर्व नागरिकांनी आपला देशाभिमान व्यक्त करावा आणि लष्कर व नागरी प्रशासनास आवश्यक तेथे आणि आवश्यक तेव्हा सहकार्य करण्यासाठी तयार राहावे, जेणेकरून राष्ट्रीय एकता व सुरक्षिततेस बळकटी देता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App