मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाख रुपये
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात RCBला यश मिळवले. या विजयानंतर आरसीबीचे चाहते सर्वत्र जल्लोष करत होते, दरम्यान बंगळुरूमध्ये संघाच्या स्वागतासाठी खास विजयी परेडचं आयोजनही करण्यात आलं होतं.
४ जून रोजी आरसीबी संघ बंगळुरूला पोहोचला तेव्हा विधानसौधा ते एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजयी परेड काढण्यात येणार होती, ज्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्याने चेंगराचेंगरी झाली. ज्यामुळे एकूण ११ जणांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण गंभीर जखमी देखील झाले. या दुर्घटनेनंतर कर्नाटक सरकावर पोलीस प्रशासनावर आणि आरसीबी व्यवस्थापनवरही टीका होवू लागली आहे. तर या दुर्घटनेनंतर आता आरसीबी फ्रँचायझीने मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जारी केलेल्या दुसऱ्या अधिकृत निवेदनात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याची माहिती दिली आहे. आरसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल बंगळुरूमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने आरसीबी परिवारास खूप दुःख झाले आहे. आदर आणि एकतेचे प्रतीक म्हणून, आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, या दुःखद घटनेत जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा निधी देखील तयार केला जात आहे. आमचे चाहते नेहमीच आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असतील. आम्ही दुःखात एकत्र आहोत.
आरसीबी संघाच्या विजय परेडमध्ये झालेल्या या दुर्घटनेबद्दल दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीनेही दुःख व्यक्त केले आहे, ज्यामध्ये त्याने फ्रँचायझीचे अधिकृत विधान सोशल मीडियावर पोस्ट केले आणि लिहिले की माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी पूर्णपणे तुटलो आहे. कोहलीशिवाय, क्रिकेट जगतातील इतर खेळाडूंनी या दुर्दैवी दुर्घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App