नाशिक : भारत स्वतंत्र झाल्याच्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सल्ला मानला गेला असता, तर पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजेच POK अस्तित्वातच राहिला नसता. तो भूप्रदेश भारताचा भाग होऊन गेला असता, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या वेळचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या चुकीवर बोट ठेवले. नेहरूंच्या पुण्यतिथीला मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सल्ल्याची आठवण काढली.
गांधीनगर मध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोदींनी ऑपरेशन सिंदूरची सगळी कहाणी सांगितली. पाकिस्तानने आत्तापर्यंत काढलेल्या सगळ्या कुरापतींचे वर्णन केले. त्यावेळी मोदी म्हणाले, ज्या दिवशी भारताची फाळणी झाली, त्याच दिवशी मुजाहिदिन नावाखाली पाकिस्तानी सैनिकांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. त्याच दिवशी या मुजाहिदींना मारून टाकले असते, तर आजची समस्या उद्भवलीच नसती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जोपर्यंत पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात सामील होत नाही, तोपर्यंत लढाई थांबवू नका, असा सल्ला दिला होता, पण तो सल्ला त्यावेळी मान्य करण्यात आला नाही म्हणून गेली 75 वर्षे पाकिस्तान व्याप्त काश्मीर नावाची भूप्रदेश अस्तित्वात राहिला पाकिस्तान सतत भारतावर हल्ले करत राहिला.
– नेमकी inside story काय??
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या या गोष्टीत ऐतिहासिक तथ्य आहे. भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी देशातल्या सगळ्या 543 संस्थानांच्या म्हणजेच रियासतींच्या विलीनीकरणाचा प्रश्न पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यावेळचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपविला होता. त्यावेळी हैदराबाद आणि जुनागड या दोन मुस्लिम संस्थानच्या विलीनीकरणाचे प्रश्न सरदार पटेल यांनी सोडविले होते. सरदार पटेल यांनी पोलिसी कारवाई करून हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेतले होते, तर जुनागड मध्ये सार्वमत चाचणी घेऊन ते संस्थान भारतात सामील करून घेतले होते. या दोन्ही संस्थानांच्या मुसलमान राज्यकर्त्यांनी सुरुवातीला दबंगगिरी करून पाहिली होती. पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी कठोरपणे त्यांची दबंगगिरी मोडून काढली होती.
परंतु, त्यावेळी पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न स्वतःच्या हातात ठेवला. आपणच त्यावर तोडगा काढून ते त्यावेळी म्हणाले होते. वास्तविक जम्मू-काश्मीर संस्थानचे राजे राजा हरिसिंग हे हिंदू होते. त्यांचा कल भारताकडेच होता. परंतु, शेख अब्दुल्लांना स्वतंत्र राज्य हवे होते. त्यांना सुरुवातीला भारत किंवा पाकिस्तान यांच्यात विलीनच व्हायचे नव्हते. स्वतःच्या राजकारणाचा स्वतंत्र पट म्हणून ते जम्मू काश्मीर कडे पाहत होते.
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर आक्रमण केले, त्यावेळी त्या आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी जम्मू काश्मीर कडे पुरेसे सैन्यच उपलब्ध नव्हते. त्यावेळी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांचे आक्रमण मोडून काढले होते. पण पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्या हद्दीत पूर्णपणे ढकलेपर्यंत पंडित नेहरूंनी कळ काढली नाही. पाकिस्तानी सैन्य अर्धवट माघारी गेले, तोच पंडित नेहरूंनी युद्धविराम जाहीर केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या जम्मू-काश्मीर मधली line of control अस्तित्वात आली. वास्तविक त्यावेळी सरकार पटेल यांनी त्या युद्धविरामाला विरोध केला होता. जोपर्यंत पाकिस्तानी आक्रमण पूर्णपणे मोडून काढले जात नाही, जम्मू-काश्मीरचा संपूर्ण भाग भारतात विलीन होत नाही, तोपर्यंत भारताने सैनिकी कार्यवाही थांबविता कामा नये, असा सल्ला सरदार पटेल यांनी दिला होता, पण नेहरूंनी तो अमान्य करत युद्धविराम केला. पण एवढेच करून नेहरू थांबले नाहीत. त्यांनी स्वतःहून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघामध्ये नेला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या तिसऱ्या पक्षाला डोके खुपसण्याची संधी कायमची मिळून गेली.
मोदींनी आजच्या भाषणात सरदार पटेल यांची आठवण काढून त्यावेळच्या पंतप्रधानांची ऐतिहासिक चूक भारतात समोर आणली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App