विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणासाठी जनआंदोलन उभे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange )यांनी आता शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन उभे करण्याची घोषणा केली आहे. सरकार कर्जमाफी कशी देत नाही तेच पाहतो, अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. आरक्षण व कर्जमाफीच्या मागणीसाठी आता मतदारसंघनिहाय बैठका घेणार असल्याचेही जरांगे पाटलांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी पुढील काळात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे व कुणबी प्रमाणपत्राचे आश्वासन दिले, परंतु ते अाश्वासन त्यांनी पाळले नाही. त्यामुळे आम्हाला विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागत आहे. या आंदोलनासाेबतच आम्ही आता शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीही लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील आंदोलन शेतकरी कर्जमाफीवर असेल, असे जरांगे यांनी सांगितले. शेतकरी अन्नदाता आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. त्यामुळे त्याची कर्जमुक्ती झालीच पाहिजे. त्यांना पीक विम्याचे पैसेही मिळाले पाहिजेत. पण सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. आता सरकार कर्जमाफी कशी करत नाही तेच मी पाहतो. आमच्या मतदारसंघनिहाय बैठकांत मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी सांगितले.
राज्य सरकार नागरिकांना काही स्वत:चे घर विकून पैसे देत नाही
सरकारला वाटते सरकारी पैसे आमचेच आहेत. सरकार काही स्वत:चे घर विकून पैसे देत नाही. सरकार आरक्षण देत नाही. चणे आणि रेवड्या देत आहे. तुम्ही शेतकऱ्याला आयुष्याचे देत नाही. निवडणुकीसाठी सरकारला वेळ मारून न्यायची होती म्हणून त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या. जनतेचा रोष सरकारला झोप येऊ देत नाही, पण आमचा रोष जाणार नाही. सरकारने आमच्या लोकांचे रक्त प्यायले आहे. हाणामाऱ्या करायला लावून त्यांना सत्ता मिळवायची आहे. आम्ही कट्टर हिंदू आहोत आणि आमचा डीएनए ओबीसींचा आहे एवढेच या सरकारला माहीत आहे. बांगलादेशची पंतप्रधान यांनी लपवून ठेवली आणि इकडे हे ‘हम हिंदू हैं’ असे सांगतात, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App