‘शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय’ असंही मुख्यमंत्री फडणवी यांनी सांगतले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण’ झाले. या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनामती, नागपूर येथून उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिक स्पर्धेतील सहभागी शेतकरी तसेच प्रगतीशील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योजकांचा सत्कार केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’चा 19वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. तसेच या योजनेलाच अनुसरून राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’अंतर्गत शेतकरी बांधवाना मिळत असलेल्या वार्षिक 6000 अनुदानामध्ये आणखी 3000 ची वाढ होणार आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यात वार्षिक 15000 जमा होतील. या योजनांमुळे मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वीच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत बळीराजा संवर्धन योजनेच्या माध्यमातून सुमारे 25000 कोटींचे 89 प्रकल्प विदर्भात पूर्ण केले. तसेच ‘स्व. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’च्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भात पहिल्या टप्प्यात 4000 कोटींची जलसंवर्धन व इतर विकासकामे राज्य सरकारने पूर्णत्वास नेली असून आणखी 6000 कोटींची विकासकामे सुरु आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शेतकरी बांधवांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘स्मार्ट’ योजनेचा व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘ॲग्री स्टॅक’चाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विस्तृत आढावा घेतला.
राज्यात जलसंधारणाच्या सुमारे 150 योजनांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य कृषी विभागाचे अभिनंदन केले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल व कृषी विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App