विशेष प्रतिनिधी
संगमनेर : Balasaheb Thorat विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण नेमके काय घडले हे आजही समजत नाही. सगळ्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले, जे दोष असतील ते निश्चित दूर करू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ते संगमनेर येथे आयोजित स्नेह संवाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला. आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो. हे सगळे होत असताना पराभव झाला. हा धक्का बसला हे मान्य करावे लागेल. 1985 पासून संगमनेर तालुक्याची वेगळी संस्कृती आपण निर्माण केली. चाळीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला विधानसभेत पाठवले. यावेळी देखील तुम्ही काम करत होतात, मी राज्यात फिरत होतो. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता. पण नेमके काय घडले हे आजही समजत नाही. प्रत्येक जण वेगवेगळे कारण सांगत आहे. सगळ्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले. जे दोष असतील ते निश्चित दूर करू, अशी ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी दिली.
संगमनेरची दंगलीचे शहर प्रतिमा पुसली
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजकारण करताना जातीय भेदभाव कधीच केला नाही. 1985 च्या अगोदर दंगलीचे शहर म्हणून संगमनेरची ओळख होती. मात्र आम्ही सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेलो आणि दंगलीचे शहर ही प्रतिमा पुसली. मग विरोधकांना हे का दिसत नाही? असा सवालही थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.
तालुक्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता
विरोधकांनी माझी प्रतिमा मुस्लिम धार्जिणा म्हणून बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी गणपतीची आरती केली. सप्ताहाला गेलो आणि सगळ्या समाजाला घेऊन पुढे चाललो. हे का नाही दिसले? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न केवळ राजकारणासाठी केला जातोय. काही बाहेरच्या मंडळींचा संगमनेर तालुक्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.
विखे पाटलांविरोधात खंबीरपणे उभा राहणार
बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या. मी स्वतः यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहणार आहे. काही झालं तरी देखील मी उभा राहणार, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
बाळासाहेब थोरातांचा 10 हजार मतांनी पराभव
दरम्यान विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातून शिंदे गटाचे अमोल खताळ यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला होता. हा पराभव बाळासाहेबांसाठी धक्कादायक होता. अमोल खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 मते मिळाली होती. तर बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मत पडली. या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App