नाशिक : काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनाचे सूप वाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृह राज्यामधूनच त्यांच्या केंद्रातल्या राजवटीला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अहमदाबाद मध्ये निर्धार केला. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि भाजप संघ यांच्यावर जोरदार तोफा डागल्या. पण भाजपशी दोन हात करण्याची रणनीती आखण्यावर मात्र पक्षात मतभेद झाल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या. सतत मोदींवर हल्ला करत राहायचा की काँग्रेसचे सर्वसमावेशक पर्यायी vision लोकांसमोर आणत राहायचे या विषयावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधले मतभेद समोर आल्याचे माध्यमांनी त्या बातम्यांमध्ये नमूद केले.
पण त्यापलीकडे जाऊन अहमदाबाद काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्ताने गुजरात मध्ये 1961 मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा एक फोटो समोर आला. 1961 मध्ये गुजरातच्या भावनगर मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. पंतप्रधान पंडित नेहरूंची लोकप्रियता त्यावेळी शिगेला पोहोचली होती. भारतावर चीनचे आक्रमण अजून व्हायचे होते. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नीलम संजीव रेड्डी यांची निवड झाली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंडित नेहरू आणि नीलम संजीव रेड्डी यांच्या जोरदार मिरवणुका काढून त्यांना मुख्य व्यासपीठावर आणले होते.
भावनगर मध्ये काँग्रेसचे जवाहर नगर नावाचे स्वतंत्र शहरच त्यावेळी उभे केले होते, पण भावनगर काँग्रेसच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य असे की अधिवेशनाचे मुख्य व्यासपीठाला कमळाच्या पाकळ्यांचा आकार दिला गेला होता. व्यासपीठाच्या छतावर महात्मा गांधींचा पूर्णाकृती कटआउट आणि व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे फोटो लावले होते. पण व्यासपीठाचा मुख्य कमळाचा आकार मात्र ठळकपणे दिसत होता.
त्यावेळी काँग्रेसवर पंडित नेहरूंचा प्रचंड प्रभाव होता. किंबहुना सर्वगामी वर्चस्व होते. पंडित नेहरूंशिवाय दुसऱ्या कोणत्याही नेत्याचा काँग्रेस नेते पंतप्रधान पदासाठी विचारही करू शकत नव्हते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व काँग्रेस अध्यक्षांनी आपली सगळी राजकीय वाटचाल केली होती. अर्थातच भावनगर अधिवेशनाचे मुख्य व्यासपीठ उभारताना कदाचित पंडित नेहरूंचा सल्लाही घेण्यात आला असावा आणि त्यांनी कमळाच्या आकाराच्या व्यासपीठाच्या रचनेला मान्यता दिली असावी. त्यावेळी पंडित नेहरूंनी असा विचार तरी केला असेल का, की ज्या कमळाच्या आकाराच्या व्यासपीठावर आपण बसलो आहोत, त्याच कमळ चिन्हाच्या पक्षाशी आपल्या पुढच्या पिढ्यांना सत्तेसाठी लढत द्यावी लागेल आणि त्या पक्षाकडून सतत पराभव स्वीकारावा लागेल!!
पण नियतीपुढे कोणाचे चालत नाही. अगदी बड्यातल्या बड्या नेत्याचे देखील निभत नाही. तसेच काहीसे पंडित नेहरूंचे झाले असावे. कमळाच्या आकाराच्या व्यासपीठावर ते बसले खरे, त्यांनी त्या व्यासपीठावरून भाषणही केले. पण त्याच कमळ चिन्हाच्या पक्षाशी नेहरू गांधी परिवाराला संघर्ष करावा लागतो आहे. नियतीचा खेळ पुढे सरकला आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App