अयुब खान, याह्या खान आणि झिया उर रहमान नाही दाबू शकले, तर मोहम्मद युनूस काय चीज आहे??, असा जोरदार सवाल करत शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने बांगलादेशात पुनरुत्थानाचा निर्धार केला.
नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ महंमद युनूस यांनी बांगलादेशात इस्लामीस्टांच्या साह्याने सरकार स्थापन केल्यानंतर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घातली. त्या पक्षाची सगळी कार्यालये सील केली. पक्षाचे बँक अकाउंट सील केले. अवामी लीगची कायदेशीर मान्यता काढून त्या पक्षाला निवडणूक लढवायला बंदी घातली. शेख हसीना यांना परागंदा होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशावर आपली राजवट लादून स्थिर करायचा प्रयत्न चालविला. त्यांनी चीनची मदत घेतली.
पण तरी देखील बांगलादेश मधल्या अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी काहीच महिन्यांनी उचल खाल्ली. अवामी लीग पक्षाला संपविणे किंवा नष्ट करणे मोहम्मद युनूस यांना शक्य नाही. 1965 मध्ये अयुब खान, 1971 मध्ये याह्या खान या पाकिस्तानी लष्करशहांना आणि 1975 मध्ये झिया उर रहमान या बांगलादेशी लष्करशहाला जे जमले नाही, ते मोहम्मद युनूस काय करून दाखवणार??, असा सवाल युद्धजित शंकर दास या पत्रकाराने केला. अयुब खान, याह्या खान आणि झिया उर रहमान यांच्यापुढे मोहम्मद युनूस यांची सत्ता किस झाड की पत्ती आहे, अशी घोषणा अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी देत बांगलादेशातले सगळ्याच्या सगळ्या 64 जिल्ह्यांमध्ये मोठमोठे मेळावे घेतले. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांच्या दबावाचा रेटाच एवढा मोठा होता की मोहम्मद युनूस यांचे सरकार या मेळाव्यांवर बंदी देखील घालू शकले नाही. मेळाव्यांच्या आयोजकांना कुठलाही धक्का लावू शकले नाही.
कारण अवामी लीग हा केवळ राजकीय पक्ष नाही तो बांगलादेशातला एक “भक्ती पंथ” आहे. बांगलादेशची निर्मिती पाकिस्तान बरोबर झालेली नाही त्या निर्मितीत कुठलाही धार्मिक वेडाचार नव्हता. बांगलादेशीयांनी बांगला भाषेसाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी युद्ध केले. ते भाषिक युद्ध होते. हे युद्ध बांगलादेशीयांनी जिंकले म्हणून 1971 मध्ये बांगलादेश निर्माण झाला. बांगलादेशाच्या निर्मितीची बीजे 1947 मध्ये नाहीत. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी बंगालवर उर्दू भाषा लादली. तिच्या विरोधात शेख मुजिबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीग नावाची चळवळ उभी राहिली. या चळवळीने स्वतंत्र देश मिळवला.
आजही बांगलादेशात सगळ्याच्या सगळ्या 64 जिल्ह्यांमध्ये अवामी लीग या एकमेव राजकीय पक्षाची कार्यालये आणि कार्यकर्ते आहेत. झिया उर रेहमान या लष्करशहाने बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीची स्थापना केली, तरी तो त्याचा पक्ष संपूर्ण बांगलादेशात रुजवू शकला नाही. बाकीचे धर्मांध पक्ष सगळ्या बांगलादेशात आपला कायमचा प्रभाव पाडू शकले नाहीत. बांगलादेशातल्या कुठल्याही राज्यकर्त्याला अवामी लीग नावाची चळवळ कधीच दाबून काढता आली नाही. ही चळवळ त्यांना नष्ट करता आली नाही. म्हणूनच अवामी लीगचे मेळावी बांगलादेशात यशस्वी झाले. त्या पक्षावर औपचारिक बंदी घालण्याखेरीज मोहम्मद युनूस यांचे सरकार दुसरे काही करू शकले नाही.
पण या सगळ्या मागे भारताचा उभा आडवा अथवा तिरका हात आहे की नाही, याविषयी मोहम्मद युनूस यांचे सरकार अजून तरी कुठली “चौकशी” “तपास” अथवा “संशोधन” जाहीर करू शकलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App