नाशिक : तामिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणणारी बातमी खरी ठरली. अण्णामलाई यांनी भाजप सोडला. पण अण्णामलाई यांनी आधी स्वतः त्याची अनाउन्समेंट करण्याऐवजी भाजपने अधिकृत प्रेस रिलिज काढून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अण्णामलाई यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली.
पण त्यापलीकडे जाऊन अण्णामलाईंनी तामिळनाडूमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईलने नवा राजकीय अवतार धरण केला. बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदुत्व अशी भूमिका घेऊन राजकारण केले. त्याच पद्धतीने अण्णामलाई यांनी तामिळनाडूमध्ये तामिळ अस्मितेची आणि देशात भारतीय राष्ट्रीयत्वाची भूमिका घ्यायचे जाहीर केले. त्यांनी तामिळनाडूच्या सुब्रमण्यम भारती आणि एपीजे अब्दुल कलाम यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेण्याचे स्पष्ट केले.
– समन्वयातून राजीनामा
अण्णामलाई यांनी डिसेंबर 2025 मध्ये भाजपचा राजीनामा द्यायची तयारी केली होती. तशी त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाला कल्पना देखील दिली होती. पण भाजपच्याच राष्ट्रीय नेतृत्वाने विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ द्या. नंतर राजीनामा द्या, अशी सूचना केल्यामुळे अण्णामलाई विधानसभेची निवडणूक होईपर्यंत भाजपमध्ये थांबले. त्यानंतर त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, पण त्यापूर्वी त्यांनी भाजपच्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांशी विशेषत्वाने संवाद साधला. त्यांनी भाजपबरोबरच्या संबंधांमध्ये कुठलीही कटुता न आणता राजीनामा देऊन ते स्वतःच्या मार्गाने राजकारण करण्यासाठी बाहेर पडले.
An Important Announcement https://t.co/IcEnfaZGRK — K.Annamalai (@annamalai_k) June 5, 2026
An Important Announcement https://t.co/IcEnfaZGRK
— K.Annamalai (@annamalai_k) June 5, 2026
– तामिळ अस्मितेसह भारतीय राष्ट्रीयत्व
त्याचवेळी अण्णामलाई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, भाजप आणि काँग्रेस यांना एकाच तागडीत तोलून त्यांना विरोध करण्याची भूमिका पत्करली. तामिळनाडू मध्ये घराणेशाहीचे राजकारण संपविण्याचा विडा उचलला. तामिळनाडू कुणीच पर्मनंट आमदार, पर्मनंट खासदार, पर्मनंट मंत्री राहणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाला बिलकुल विरोध केला नाही. पण त्याचवेळी तामिळ अस्मितेशी तडजोड करायला सुद्धा त्यांनी मान्यता दिली नाही. तामिळ अस्मितेसह भारतीय राष्ट्रीयता या सूत्रावरच त्यांनी नव्या राजकीय चळवळीची घोषणा केली.
– मराठीचा मुद्दा आणि हिंदुत्व
नेमकी अशीच घोषणा बाळासाहेबांनी 1966 मध्ये शिवसेना स्थापन करताना केली होती. बाळासाहेबांनी महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा उचलून धरला, पण त्याचवेळी देशात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा रेटून पुढे आणला. भाजप ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली गांधीवादी समाजवादाचा जप करत होता, त्यावेळी बाळासाहेबांनी राजकीय हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणून थेट विधानसभा निवडणुकीत आमदार निवडून आणून दाखविला होता. रमेश प्रभूंची निवडणूक त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकून दाखविली होती.
– बाळासाहेबांचे मूळ सूत्र
तामिळनाडूत आज वेगळ्या राजकीय चळवळीची घोषणा करताना अण्णामलाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले नाही, पण प्रत्यक्षात बाळासाहेबांच्या राजकीय चळवळीचे सूत्र अण्णामलाई यांनी तामिळनाडूत वापरले. त्यांनी तामिळ अस्मितेला भारतीय राष्ट्रीयत्वाशी जोडून घेतले.
– तमिळ पक्षांचा अतिरेक
तामिळनाडूमध्ये तमिळ अस्मितेच्या नावाखाली द्रविड मुन्नेत्र कळघम, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अन्य प्रादेशिक पक्ष निघाले, पण त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भारतीय राष्ट्रीयत्वाला विरोध केला. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावले. या तामिळ पक्षांमध्ये काळाच्या ओघात काँग्रेस सारखीच घराणेशाही शिरली. त्यामुळे त्यांची तमिळ अस्मितेची भावना अतिरेकी आणि तीव्र बनली. बाळासाहेबांनी शिवसेनेची भूमिका कधीच एवढी अतिरेकी मराठी अस्मितेची बनविली नव्हती. त्यांनी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व यांची उत्तम सांगड घालून शिवसेनेचे राजकारण चालविले होते.
– भाजपपासून फारकत, पण राष्ट्रीयत्वापासून फारकत नाही
अण्णामलाई यांनी त्याच पद्धतीने एकीकडे घराणेशाहीला विरोध, दुसरीकडे द्रविडी राजकारणाला विरोध आणि त्याच वेळी मूळ तमिळ अस्मितेचे राजकारण करताना भारतीय राष्ट्रीयत्वाशी सुद्धा निष्ठा आणि सूत्रबद्धता या तत्त्वावर नवी राजकीय चळवळ सुरू करायची घोषणा केली. अण्णामलाई भाजपपासून फारकत घेतली, पण भारतीय राष्ट्रीयत्वापासून फारकर घेतली नाही, हे त्यांच्या आजच्या राजकीय चळवळीच्या घोषणाचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य ठरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App