नाशिक : काकांना दैवत म्हणून पुतण्याची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काकांच्या पक्षातून स्वतःच्या पक्षाची नवी भरती!! असला प्रकार अजितदादांच्या रणनीतीतून समोर आला आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांची बैठक घेऊन पक्षाची नवी रणनीती ठरवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात हे लक्षात घेऊन आपण तीन दिवस मुंबईत आणि चार दिवस सगळ्या महाराष्ट्रात दौरे वाढवणार आहोत, असे अजित पवारांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले. एकदा मंत्री पद मिळाले की ते कायमच राहील असे समजायचे कारण नाही. तीन चुका माफ करू, पण नंतरच्या चुकीला माफी नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी मंत्र्यांसकट राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना दिला.
पण विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी चिंचवड मधल्या सत्कार समारंभात त्यांनी शरद पवारांना आपण “घरातले दैवत” मानत होतो आणि यापुढेही मानत राहू, असे सांगत पवारांच्याच पक्षात राजकीय सुरुंग लावला. माजी आमदार विलास लांडे यांना उद्देशून बोलताना अजितदादा म्हणाले, विलास, कधीतरी निर्णय घ्यावा लागतो. आम्ही निर्णय घेतला. सारखं तळ्यात मळ्यात चालत नाही. शब्दाला पक्कं राहावं लागतं. पवार साहेबांना आम्ही कालही घरातलं दैवत मानत होतो आजही मानतो पण देशात मोदी साहेबांसारखा मजबूत नेता आहे त्यामुळे त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला असे सविस्तर भाषण अजित पवारांनी केले.
या भाषणातून अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय सुरूंग लावला. शरद पवारांना घरातले दैवत ठेवून तुम्हाला स्वतंत्र निर्णय घेता येऊ शकेल, असा सूचक इशारा त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला. तुम्ही जाहीरपणे शरद पवारांना “दैवत” म्हणा आणि आमच्या पक्षात येऊन भाजपच्या सत्तेच्या वळचणीला या, असेच अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुचविले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात हे लक्षात घेऊनच अजितदादांनी ते वक्तव्य केले. महाराष्ट्रात भाजप + शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुती सत्तेवर असली तरी सर्व पक्षांच्या रणनीतीनुसार हे सगळे पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणूकक्षम नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची गरज भासली, तर त्यांची भरती शरद पवारांच्या पक्षातून करावी लागेल याची त्यांना जाणीव झाल्याने म्हणूनच शरद पवारांना दैवत म्हणून स्वतंत्र निर्णय घेऊन त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते आपल्या पक्षात येऊ शकतात अशी राजकीय सोय अजितदादांनी करून टाकली. याचे पडसाद आणि परिणाम लवकरच पवारांच्या पक्षात उमटण्याची चिन्हे दिसण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App