विशेष प्रतिनिधी
मुंबई : वडील गंभीर आजारी पण रस्त्याची सुविधा नसल्याने त्यांना मुंबईपर्यंत पोहोचणे अवघड झाले.त्यामुळे आजारपणात वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी त्यांचे निधन झाले.चिपी विमानतळ उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला वडलांच्या आठवणीने नारायण राणे यांना गलबलून आले.Union minister Narayan Rane is moved by the memory of father in the eve of inauguration of Chipi airport
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये राणे यांनी कोकणातील जुन्या काळातील परिस्थिती मांडली आहे.
राणे यांनी म्हटले आहे की माझ्या वडिलांचे वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी निधन झाले. त्याचे कारण म्हणजे माझ्या वरवडे गावातून वडिलांना उपचारासाठी वेळेत हलवता आलं नाही. मी त्यांच्यापर्यंत मुंबईतून वेळेत पोहोचू शकलो.
केवळ वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून मी वडलांना गमावलं. त्या आठवणीनं माझ्या डोळ्यांच्या कडा आज ओलावत आहेत. पण त्याचवेळी ही वेळ दुसऱ्या कोणावर ओढवू नये यासाठी केलेला संघर्ष यशस्वी होत असल्याचा आनंद, कृतार्थता यानं माझं मन काठोकाठ भरुन आलं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राणे यांनी म्हटले आहे की, मला आठवतात माझ्या कोकणातले धुळीने, खड्ड्यांनी भरलेले रस्ते. पावसाळ्यात पाच-दहा मैलाचं अंतर कापणंसुद्धा मुश्किल होऊन जायचं. एसटी आणि बंदराला लागणाऱ्या बोटी एवढाच काय तो जगाशी संपर्क साधण्याचा मार्ग. पण त्यासाठी सुद्धा किती धडपडावं लागायचं. कोणाला शिक्षणासाठी परगावी जायचं असो.
कोण्या लेकीबाळींना मुलाबाळांसह माहेराला यायचं असो. पोटाच्या ओढीनं कोणाला देशावर, मुंबईला जायचं असो की जीवाच्या दुखण्यानं आजारी पडलेल्या कोणाला औषधपाण्यासाठी दवाखाना गाठायचा असो. कोकणातला प्रवास ही मोठी अडचण होती. हिंदीत प्रवासाला ‘यातायात’ का म्हणतात, यावरुन ख्यातनाम साहित्यिक पु. लं. देशपांडे यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात खुमारीनं लिहिलं आहे. पण अशी ‘यातायात’ कोकणी माणसाच्या नशिबालाच पुजलेली होती.
राणे म्हणतात, “ते दिवस आपण प्रयत्नपूर्वक पालटवले. केवळ रस्ते नाहीत, प्रवासाच्या सुविधा नाहीत म्हणून असं जीवाचं माणूस गमवण्याची पाळी कोणावर येणार नाही. कणकवलीतही अत्यंत अद्ययावत रुग्णालय आपण उभारलं आहे. आता मुंबईतलीच नव्हे तर अगदी जगाच्या पाठीवर कुठच्याही देशात असलेली माझ्या कोकणातली माहेरवाशीण अवघ्या काही तासात चिपी विमानतळावर तिच्या लेकराबाळांसह, सामानसुमानासह अवघ्या काही तासात ‘लँड’ होईल.
तीही प्रवासाचा शीण न येता. हसत. मजेत. देवगडचा माझा आंबा-काजू उत्पादक मुंबई-दुबईत त्याच्या मालाचा व्यवहार करण्यासाठी जाऊन एक-दोन दिवसात आपल्या बागेत परत येईल. महाराष्ट्रभर, जगभर पसरलेल्या चाकरमान्यांना गणपतीसाठी, शिमग्यासाठी काही तासात कोकणातलं घर गाठता येईल..”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App