प्रतिनिधी
मुंबई : जी किमया भल्याभल्यांना साधली नाही ती किमया शिंदे फडणवीस सरकारच्या एका निर्णयाने साधली आहे. मुंबईतील मेट्रोची कार शेड कंजूरमार्ग ऐवजी आरे या मूळ स्थानीच बांधण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केला. त्यामुळे त्या विरोधात आता ठाकरे काका पुतणे एकत्र आल्याचे दिसत आहे. Thackeray uncles and nephews brought together in protest of Metro’s Aarey car shed
महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत पवार काका पुतण्यांची जोरदार चर्चा होती. त्याआधी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या काका पुतण्यांची चर्चा होती पण आता आरे मधील कार शेडच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरे हे काका पुतणे एकच भूमिका घेऊन शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. मेट्रो-3 कारशेड कांजुरमार्ग ऐवजी आरेमध्येच बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला शिवसेनेने विरोध केला असतानाच आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
अमित ठाकरेंची फेसबूक पोस्ट
अमित ठाकरे यांनी एक फेसबूक पोस्ट करत आरेमधील कारशेडच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मेट्रो कारशेड आरेतच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.
आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे शिंदे सरकारला केली आहे.
उद्धव ठाकरेंचा विरोध
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात आधी मी त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मुंबईच्या विकासाच्या आड येण्याचा माझा विचार नव्हता, कांजुरमार्गचा पर्याय मी त्यावेळी सुचवला. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की आरेत कारशेड करण्याचा निर्णय आपण रेटू नका. माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App