पक्ष चालविणारा वारस निर्माण करण्यात पवार अपयशी; ठाकरे – राऊतांचा सामनातून ठपका!!

प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यानंतर महाविकास आघाडी संपूर्ण विखुरल्यात जमा आहे. तशी लक्षणे घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यातून दिसत आहेत. त्या पलीकडे जाऊन आज उद्धव ठाकरेंच्या सामनाने थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चालवणारा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरल्याचा ठपका सामनाने त्यांच्यावर ठेवला आहे, इतकेच नाहीतर पवारांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि राजकीय कर्तृत्वाची परखड शब्दांत मर्यादाही दाखवून दिली आहे. Sharad Pawar failed to create appropriate political heir in NCP

पवार राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसचा शेंडा, बुडखा आणि बुंधा सर्वकाही महाराष्ट्रातच आहे आणि पवारांच्या सहकार्यांनाच सगळे महाराष्ट्रातच हवे आहे, अशा शब्दांत सामनाने पवारांच्या राष्ट्रीय राजकारणाचे वाभाडे काढले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना-ठाकरे गटाने मोठं विधान केलं आहे. “शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असे शरसंधान सामनाने साधले आहे.



 सामना अग्रलेखात म्हणतो :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही.

पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी

  • पक्षाचा शेंडा – बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे, ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला आणि प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला.
  • कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली आणि लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला. यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाट्यावर पडदा पडला आहे.
  • शरद पवार यांनी जे राजीनामा नाट्य घडवले ते नौटंकी होते, अशी टीका भाजपाने केली. भाजपा हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे. दुसरे असे की, इतरांवर नौटंकी असा आरोप करण्यापूर्वी जगातील सगळ्यात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे. देशाच्या राजकारणाची नौटंकी करणाऱ्यांना दुसऱ्यांच्या घडामोडी नौटंकीच वाटणार.
  • भाजपाची पोटदुखी अशी की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लॅन’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते आणि येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांच्या खेळीने भाजपाचा ”प्लॅन’ कचऱ्याच्या टोपलीत गेला आणि त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता.
  • त्या गटाचा प्लॅन तूर्त फसला. त्यांना काही काळ तरी आता राष्ट्रवादीत थांबावे लागेल. याचा अर्थ भविष्यात ते राष्ट्रवादीचेच थांबतील याची कोणतीही खात्री नाही.

Sharad Pawar failed to create appropriate political heir in NCP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात