प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठीच्या निवडणुकीला 3 दिवस उरले असताना नियोजित वेळेआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षावर बैठक घेतली. त्यानंतर लक्ष आहे माझे असा दम भरत सगळ्या आमदारांची रवानगी हॉटेल रिट्रीटला केली, तर काँग्रेस – राष्ट्रवादीदेखील त्यांचे आमदार हॉटेल ट्रायडेंटला पाठवणार आहे. मात्र आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार या संधीचा फायदा घेऊ लागले आहेत. पाठिंब्याच्या बदल्यात महाविकास आघाडीकडे ते विविध मागण्या करून शिवसेनेची कोंडी करत आहेत.Independent, Shiv Sena suffocated by small parties; Thackeray – Pawar’s booster dose of show of strength on it
पण ठाकरे – पवारांनी त्या कोंडीवर शक्तीप्रदर्शनाचा उतारा काढला आहे. आज सायंकाळी 7.00 वाजता हॉटेल ट्रायडंट मध्ये महाविकास आघाडी आणि अपक्ष आमदार यांच्या संयुक्त विशेष बैठकीचा कार्यक्रम होणार आहे. या बैठकीत सगळ्यांना आघाडीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली जाणार आहे.
आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न
सध्या राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणणे हे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे, कारण भाजपने संजय पवार यांचा पराभव करणार असल्याचे ठासून सांगितले आहे, त्यामुळे या निवडणुकीत आमदारांच्या मतांची फोडाफोडी होईल, अशी शक्यता आहे. म्हणून आता शिवसेना आणि भाजप हे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र आता याचा फायदा आपसूकच अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचे आमदार घेत आहेत.
कोण कोंडी करत आहेत?
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने सरकारला घेरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.
बहुजन विकास आघाडीकडे ३ मते आहेत, या पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी राज्यसभा निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी माझी 3 मते गृहीत धरू नये, असे ठणकावून सांगितले आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षांनी आपल्याला सहकार्य करावे, अशी अट घातली आहे.
अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी निधीवाटप आणि मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारमधील मंत्री मतदारसंघातील कामासाठी टक्केवारी मागत आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे.
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आम्ही घोडे नाही. आम्ही बाजारात उभे नाही. घोडे म्हणणे हा आमचा अपमान आहे, असे म्हटले आहे. पण नंतर त्यांना खासदार सुप्रिया सुळे या चंद्रपुरात घरी जाऊन भेटल्या आहेत.
अबू आझमींच्या समाजवादी पक्षाची २ मते आहेत. समाजवादी पक्षाने अल्पसंख्याक विकास आणि मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दयावर सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
एमआयएम आणि मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. पण त्यांचा कल महाविकास आघाडीच्या विरोधात आहे, हे उघड आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App