विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निकालही रात्रीपर्यंत जाहीर होईल. महायुतीचे 9 व महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस व उद्धवसेनेच्या उमेदवारांना विजयाची खात्री आहे. मात्र अजित पवारांच्या गटातील दोनपैकी एक व शरद पवार गटाने पुरस्कृत केलेल्या एका उमेदवाराचे भवितव्य संकटात आहे. उद्धवसेनेकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ नसले तरी काँग्रेसच्या मदतीमुळे त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ‘सुरक्षित’ झाल्याचे मानले जाते. नार्वेकरांनी गुरुवारी विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आमदारांच्या भेटीगाठी घेत विजयाचे संकेत दिले आहेत.Voting today for 11 Legislative Council seats; BJP has numerical strength, the fate of one of the two candidates of Ajit Pawar is uncertain
काँग्रेसच्या मतांवर उद्धवसेना, अजितदादा गटाचा डोळा
भाजपचे 5 उमेदवार. त्यांना 115 मतांची गरज. भाजपकडे 103 आमदार. अपक्ष व मित्रपक्षांची 13 ते 15 मते त्यांना मिळू शकतात. शिंदेसेनेचे 2 उमेदवार. त्यांना 46 मतांची गरज. या पक्षाचे 38 आमदार असून शिंदेंसोबत 10 अपक्ष आहेत. अजित पवार गटालाही 2 उमेदवारांसाठी 46 मते हवी. त्यांचे 40 आमदार, काही अपक्षही त्यांच्यासोबत. मात्र यापैकी काही मते फुटून शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता. त्यामुळे दादांचा एक उमेदवार संकटात. मात्र काँग्रेसची काही मते फोडून दुसरा उमेदवार जिंकून आणण्याची अजित पवार गटाचा प्रयत्न असेल.
काँग्रेसला फक्त 23 मतांची गरज. त्यांच्याकडे 37 आमदार आहेत. उद्धवसेनेकडे 15 मते आहेत. पण काँग्रेसच्या अतिरिक्त मतांमुळे त्यांचा मार्ग सुकर. शरद पवार गटाकडे 12 तर शेकापचा 1 आमदार आहेत. त्यामुळे पवार गटाला अजून 10 मतांची गरज. आघाडीतील छोट्या मित्रपक्षांची 5 ते 6 मते मिळू शकतील. तरी अजून 4 ते 5 मते हवीत. ती दादा गटातून फोडता आली तरच शरद पवार गटाचा विजय शक्य, अन्यथा पराभवाची नामुष्की ओढवेल.
काँग्रेसचे गोरंट्याल म्हणतात.. आमचे 4 आमदार फुटू शकतात
एका उमेदवाराला 23 मतांचा कोटा असेल. गुप्त मतदान होणार असल्याने महायुती व आघाडीला आमदारांची मते फुटण्याची धास्ती आहे. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमचे तीन-चार आमदार फुटण्याची शक्यता बोलून दाखवली. मात्र काँग्रेसकडे 37 मते असल्याने मते फुटली तरी त्यांच्या उमेदवाराला धोका नाही. पण काँग्रेसच्या जादा मतांवर नार्वेकरांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, काँग्रसेचे नव्हे तर भाजपचीच मते फुटतील, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. तर विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या आमदारांना व्हीप बजावला आहे.
हे आहेत उमेदवार
भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर रिंगणात आहेत. शिंदेसेनेने माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना तर अजित पवार गटाने शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, उद्धवसेनेकडून मिलिंद नार्वेकर तर शरद पवारांच्या गटाकडून शेकापचे जयंत पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App