विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vijay Wadettiwar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक मूळ ओबीसींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या सर्व जागा कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आलेले मराठा समाजाचे उमेदवार घेऊन जातील. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच उरणार नाही, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केली. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने ओबीसी समुदायात एकच खळबळ माजली आहे.Vijay Wadettiwar
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीच्या मुद्यावरून रान पेटवले आहे. वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात ओबीसींचा मोठा मेळावा घेतला. त्याद्वारे त्यांनी ओबीसींची प्रचंड ताकद दाखवून दिली. त्यानंतर सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारकडे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर रद्दबातल करण्याची मागणी केली. या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला मोठा फटका बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना फटका बसेल. त्यांचा माणूस स्थानिकच्या निवडणुकांत दिसणारही नाही. कारण, बळी तो कान पिळी या म्हणीनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीत आलेले लोक सर्व जागा घेऊन जातील. हे कसे घडेल? हे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आकडेवारीसह दाखवून देऊ. त्यामुळे जे लोक सध्या 2 सप्टेंबरच्या जीआरमुळे नुकसान होणार नाही असा दावा करत आहेत, त्यांनी यावर विचार करावा.Vijay Wadettiwar
जीआर 4 जिल्ह्यांचा, पण लाभ महाराष्ट्रभर
ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा आपला जीआर रद्द करावा. या प्रकरणी कोण काय म्हणत आहे याविषयी आम्हाला देणेघेणे नाही. पहिल्यांदा या जीआरमध्ये पात्र हा शब्द होता. पण त्यानंतर तो वगळण्यात आला. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ओबीसी प्रमाणपत्र मिळाले तर त्याचा नातेसंबंधांत कुठेही गैरवापर होण्याची शक्यता आहे. हे सत्तेतील मंत्र्यांना समजत नसेल, तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. कारण, एकदा प्रमाणपत्र भेटले तर त्याचा वापर कुठेही होऊ शकतो. सरकारचा जीआर 4 जिल्ह्यांसाठी मर्यादित असला तरी त्याच्या बळावर महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळवता येते. लाभार्थी व्यक्ती नोकरीसह आर्थिक सवलतीही घेऊ शकतो.
ओबीसीच्या नावाने केवळ बनवाबनवी सुरू
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारवर ओबीसी समाजाच्या वसतिगृहाला देण्यासाठी पैसे नसल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, सरकारकडे ओबीसी समाजाच्या वसतिगृहांसाठी पैसे नाहीत. हे कसले नतदृष्ट सरकार आहे. 7 टक्के लोकांना हवे तेवढे पैसे, पण ओबीसींना साधी वसतिगृहाची इमारतही बांधून मिळणार नाही. सरकार दीड लाख तरुणांना 500 कोटीही देऊ शकत नाही. ओबीसींना मूर्ख बनवू नका. ही बनवाबनवी चालणार नाही. वसतिगृहाशी संबंधित निर्णय मी स्वतः घेतला. महाज्योती कागदावर होती. ती मी सुरू केली होती. आम्ही ज्या योजना सुरू केल्या त्याविरोधात कट रचण्यात आला. ओबीसींच्या 1300 मुलांना आम्ही फेलोशिप दिली. तो आकडा आता 100 वर घसरला आहे. ही सगळी बनवाबनवी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App