प्रतिनिधी
मुंबई : MLA Parinay Phuke नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला होता. हा मुद्दा आज विधानसभेतही गाजला. नागपूरच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता नागपूरमधील हिंसाचारामागे अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सभागृहात केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शहरी नक्षलवादविरोधी कायदा 2024 लवकरात लवकर अंमलात आणण्याची मागणी केली.MLA Parinay Phuke
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात दगडफेकीसह वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली होती. या दगडफेकीत 33 पोलिस जखमी झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी मुघल बादशहा औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्याच्या मुद्यावरून ही घटना घडली होती. या घटनेचे पडसाद आज अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यावर बोलताना भाजप आमदार परिणय फुके यांनी उपरोक्त आरोप केला आहे.
नेमके काय म्हणाले परिणय फुके?
नागपूरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये मुस्लिम बांधवांना मोठ्या प्रमाणात भडकावण्याचे काम केले. या सगळ्या षडयंत्रामागे छुपे अर्बन नक्षलवाद्यांचा हात आहे, असा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी आज विधानसभेच्या सभागृहात केला. या अर्बन नक्षलवाद्यांवर कारवाई करणे फार आवश्यक आहे. मागच्या अधिवेशनात महाराष्ट्र शहरी नक्षलवादविरोधी कायदा 2024 सभागृहात मांडण्यात आला होता. हा कायदा लवकरात लवकर तयार करून अंमलात आणून अर्बन नक्षलवादाच्या एनजीओज ठेचल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये देशभराच्या तुलनेत अर्बन नक्षलवाद एनजीओ जास्त आहे, या एनजीओ ठेचून महाराष्ट्रातील अर्बन नक्षलवाद संपुष्टात आणला पाहिजे, अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी विधानसभेच्या सभागृहात केली.
आमदार परिणय फुके पुढे म्हणाले, यापूर्वी गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद असल्यामुळे कोणताही उद्योग येऊ शकला नाही. तिथे मोठ्या प्रमाणात लोखंडाच्या खाणी होत्या. त्याला कोणी हात लावू शकले नाही. पण आज तिथे हजारो हेक्टरची लोह खाण सुरू झालेली आहे. यामाध्यमातून तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून शोधून काढू
दरम्यान, नागपूर येथील घटनेवर मुख्यमंत्री म्हणाले, काही लोकांना जाणीवपूर्वक लक्ष केले. त्या ठिकाणी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली होती. परंतु जाणीवपूर्वक चुकीचा मेसेज व्हायरल करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, नागपूर प्रकरणात पोलिस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू. आरोपींना इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवरील हल्ल्याला माफी मिळणार नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. नागपूर शहर शांत आहे. ते नेहमी शांत असते, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App