विशेष प्रतिनिधी
धुळे: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. माजी महसूल मंत्री तसेच तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे, यांच्याविरोधात सन २०१६ मध्ये केलेले आरोप हे सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्यासाठी आता अडचणीचं कारण ठरू शकतं. Anjali Damania
खडसे यांच्याविरोधात निराधार आरोप केल्याप्रकरणी दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ४९९ (मानहानी) आणि ५०० (मानहानीसाठी शिक्षा) या अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद १२ ऑगस्ट २०१६ रोजी ॲड. अमित जैन व ॲड. सुधाकर पाटील यांच्या मार्फत करण्यात आली होती.
२०१६ मध्ये अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदा आणि विविध वृत्तवाहीन्यांच्या मुलाखतींमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर अनेक आरोप केले होते. या आरोपांमुळे खडसेंबरोबरच भारतीय जनता पक्षाचीही प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यामुळेच शिरपूर शहर व तालुक्यातही काही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने पोलीस तपासाचे आदेश दिले होते. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील, निलेश महाजन, नितीन माळी व आणखी काही साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला. Anjali Damania
त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली. मात्र, सुनावणी दरम्यान अंजली दमानिया न्यायालयात हजर राहिल्या नव्हत्या. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बी डब्ल्यू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, २३ सप्टेंबर पर्यंत दमानिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ सप्टेंबर २०२५ रोजी असून, हा पुढील कार्यवाहीसाठी अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App