विशेष प्रतिनिधी
मुंबई : दोघात तिसरा, आता सगळं विसरा, अशा सिनेमा सारखी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे. तिघांच्या आघाडीत घेतला चौथा, जागा वाटपाचा तिढा वाढला!!, असे म्हणायची वेळ आली आहे. महाविकास आघाडीतल्या ठाकरे, पवार आणि गांधी यांच्याच पक्षांमध्ये आपापसात जागावाटप ठरत नव्हते. आकड्यांवरून मोठे मतभेद होते. पण जागा वाटपाचा मूळ तिढा सोडवण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षांनी प्रकाश आंबेडकरांच्या चौथ्या घटक पक्षाला आघाडीत घेतले आणि जागा वाटपाचा तिढा आणखी वाढवून ठेवला.took fourth in a front of three; Seat allotment has increased!! 8 seats in the Lok Sabha are leading in a blur!!
काल हॉटेल ट्रायडेंट मध्ये झालेल्या बैठकीत ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि गांधींची काँग्रेस या तीन पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला बाहेर ताटकळत तासभर ठेवले. त्यामुळे महाविकास आघाडीत एन्ट्री देण्यापूर्वीच वंचितचा अपमान केल्याची भावना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये पसरली. पण बैठकीच्या अखेरीस नाना पटोले जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सहीचे पत्र प्रकाश आंबेडकरांच्या नावाने निघाले आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत एंट्री मिळाली. पण ही एन्ट्री झाली कागदावर!!
प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये जागावाटप फायनल झालेले नसताना प्रकाश आंबेडकरांचा चौथा पक्ष महाविकास आघाडीत आला. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा जास्त वाढला आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातल्या 48 पैकी 40 जागांवर आघाडीतल्या तीन घटक पक्षांचे एकमत झाल्याचे बोलले जात आहे. याचाच अर्थ 8 जागांवर मतभेद आहेत.
या 8 जागांमध्ये नागपूरमधील रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे. जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस याच जागांवर दावा करत आहेत. याशिवाय काँग्रेस मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मुंबई काँग्रेस मागत आहे. सध्या या आठही जागांवर शिवसेना (ठाकरे आणि शिंदे) आणि भाजप यांचे खासदार आहेत.
तिढा असलेल्या जागी विद्यमान खासदार
रामटेक : कृपाल तुमाणे (शिवसेना शिंदे गट)
हिंगोली : हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट)
वर्धा : रामदास तडस (भाजप)
भिवंडी : कपिल पाटील (भाजप)
जालना : रावसाहेब दानवे (भाजप)
शिर्डी : सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट)
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शिवाळे (शिवसेना शिंदे गट)
मुंबई उत्तर पश्चिम : गजानन कीर्तिकर (शिवसेना शिंदे गट)
ठाकरे गटाचा जागा सोडण्यास नकार
मात्र मुंबईतील दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही, तर हा मुद्दा तिन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशनंतर वंचितसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात आली आहे. कारण तिथून प्रकाश आंबेडकर स्वतःच लढणार आहेत. पण वंचित बहुजन आघाडी या एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी जागांची मागणी करणार हे महाविकास आघाडी टिकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकतो.
शिवाय पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच कायम राहणार आहे. त्यामुळेच आधीच महाविकास आघाडीतल्या तीन घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचे एकमत नव्हते, त्यात आता वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीमुळे मतभेदांवर तोडगा निघण्याऐवजी त्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रातली युती अथवा आघाडी 1 – 2 जागांमुळे तुटल्याचा गेल्या 15 – 20 वर्षांचा इतिहास आहे. इथे तर महाविकास आघाडीच्या 4 घटक पक्षांमध्ये तब्बल 8 जागांवर मतभेद आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य महाराष्ट्रात नेमके काय राहील??, हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App