नाशिक : शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.The next generation of Shinde and Ambedkar campaigned vigorously; but the next generation of Thackeray and Pawar also stayed at home!!
– श्रीकांत शिंदे प्रचाराचा आघाडीवर
एकनाथ शिंदे यांची पुढची पिढी म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ श्रीकांत शिंदे यांच्याच सभा आणि महापालिका क्षेत्रांमध्ये झाल्या. एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती ठेवली असली तरी प्रचारात मात्र त्यांनी श्रीकांत शिंदे यांना देखील पुढे आणले. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पुणे नाशिक, अमरावती आदी महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या, रोड शो आयोजित केले. त्यांच्या सभांना आणि रोड शो यांना सुद्धा सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप सोडून सुद्धा स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकते असे चित्र यामुळे निर्माण झाले. यात एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ श्रीकांत शिंदे यांचाही वाटा मोठा ठरला.
Shinde and Ambedkar.jpg1
– सुजात आंबेडकरांचाही धडाका
त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांची पुढची पिढी म्हणजेच त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात आघाडी घेतली. प्रकाश आंबेडकरांनी मुंबईत काँग्रेसशी आघाडी केली. पण बाकी सर्व महापालिकांमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची ठरविली. त्यासाठी त्यांनी स्वतः प्रचारात आघाडी घेतलीच पण त्याचबरोबर सुजात आंबेडकर यांनी देखील सभा घेण्यात रोड शो आयोजित करण्यात पुढाकार घेतला. सुजाता आंबेडकरांनी विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा घेतल्या. यात त्यांनी अकोला, अमरावती याचबरोबर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी महापालिका परिक्षेत्रात जाऊन प्रचार केला त्याचबरोबर मुंबई आणि ठाणे पट्ट्या देखील त्यांनी स्वतंत्र सभा घेतल्या.
महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे आपली पुढची पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात आणली.
– ठाकरेंची पुढची पिढी मुंबईतच अडकली
पण त्याचवेळी ठाकरे आणि पवार यांची पुढची पिढी मात्र घरात बसलेली दिसली. वास्तविक सुरुवातीला आदित्य ठाकरे यांनी मुंबई सह नाशिक आणि पुण्यात सुद्धा शिवसेनेचे मेळावे घेतले पण नंतर त्यांनी मुंबई सोडून इतरत्र प्रचार केल्याचे दिसले नाही. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई सोडलीच नाही. मध्यंतरी त्यांनी फक्त सोलापूरचा दौरा केला, पण तिथे सुद्धा त्यांनी प्रचार सभा न घेता भेटीगाठींवरच भर दिला. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जी शक्ती निर्माण झाली, तिचा वापर ठाकरे बंधूंनी मुंबईच्या पलीकडे जाऊन केलाच नाही त्यातही त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला इतरत्र फिरू दिले नाही.
– पवारांची पुढची पिढी घरात
त्याचबरोबर अजित पवारांनीच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये राष्ट्रवादींच्या प्रचाराची सूत्रे स्वतःच्याच हाती ठेवली. वयाचा मुद्दा लक्षात घेऊन पवारांनी प्रचारात उतरणे शक्यच नव्हते पण अजित पवारांच्या खेरीज बाकी कुठल्या पवारांनी प्रचारात भागही घेतला नाही. पवारांच्या पुढच्या पिढीने सुद्धा घरात बसणेच पसंत केले. अजित पवारांची पुढची पिढी म्हणजेच पार्थ पवार किंवा जय पवार प्रचारात उतरणे शक्यच नव्हते. कारण पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा विषय अजितदादांच्या आणखी गळ्याशी आला असता. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गलितगात्र अवस्था पाहता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रचारापासून दूर राहणेच पसंत केले. रोहित पवारांना आपली जामखेड नगरपरिषद टिकवता आली नाही. शिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मतदार यादीत केलेल्या घोटाळ्याचा विषय रोहित पवारांच्या अंगाशी आला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत अजित पवारांना मम म्हणण्याखेरीज त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही.
त्यामुळे स्वतःला फार मोठे “ब्रँड” समजणाऱ्या ठाकरे आणि पवार यांची पुढची पिढी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फार मर्यादित काम करू शकली किंवा तिला कुणी फारसे पुढे येऊ दिले नाही. त्या उलट शिंदे आणि आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आली, असाच या घडामोडींचा अर्थ निघाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App