नाशिक : एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागते आहे, हीच खरी बातमी आहे, असे म्हणायची वेळ सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हालचालींवरून आली आहे.
शरद पवार आजारी असताना त्यांच्या राज्यसभा खासदारकीच्या जागेसाठी सुप्रिया सुळे यांच्यापासून ते शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत सगळेच नेते दिल्ली पासून मुंबई पर्यंत लॉबिंग करण्यात गुंतलेत. या राजकीय घडामोडीची माहिती स्वतः सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या खासदारकीसाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली, तर जयंत पाटलांनी काँग्रेसच्या नेत्यांची आणि उद्धव ठाकरे यांची वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या आमदारांनी काँग्रेसच्या वेगवेगळ्या आमदारांची त्याच विषयावर चर्चा केली, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
महाविकास आघाडीतल्या सगळ्याच नेत्यांना शरद पवार राज्यसभेत जावे असे वाटत असेल, तर त्यांना महाविकास आघाडीतून राज्यसभेत पाठवता येईल. त्यासाठी मी दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अर्थात या संदर्भात शरद पवारांशी चर्चा अद्याप झाली नाही, असाही खुलासा त्यांनी केला.
त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते मुंबईला जातील. तिथे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातील. नंतर ते सिल्वर ओक वर जाऊन दोन-तीन दिवस विश्रांती घेतील. यादरम्यान जयंत पाटील शरद पवारांशी चर्चा करतील. त्यांना राज्यसभा निवडणूक लढवायच्या आग्रह धरतील, असेही शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे म्हणाले.
काँग्रेस आणि शिवसेनेचा खोडा
मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीत मोठा खोडा घालून ठेवलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण संदर्भात आधी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, मगच शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला महाविकास आघाडी पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेऊ शकेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांनी तर राज्यसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा ठोकून दिला. रोटेशन मध्ये ही जागा आता शिवसेनेकडे यायला पाहिजे. कारण आधीच्या राज्यसभा निवडणुकीत तसेच ठरले होते, असे आदित्य ठाकरे स्पष्टपणे म्हणाले. पण शरद पवारांचे नाव पुढे आले तर इतर कोणाचे नाव पुढे येईल असे वाटत नाही, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.
लॉबिंग करावेच का लागते??
त्यामुळेच तर सुप्रिया सुळे यांच्यापासून ते शशिकांत शिंदे यांच्यापर्यंत सगळ्या नेत्यांना शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली पासून मुंबई पर्यंत लॉबिंग करावे लागते आहे. एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी ही सगळी राजकीय घडामोड घडवून आणावी लागत आहे. एरवी शरद पवारांनी नुसती इच्छा जरी व्यक्त केली असती, तरी त्यांना राज्यसभेची खासदारकी सहज मिळाली असती, पण शरद पवारांचे राजकारण विश्वासार्ह नाही. ते महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतांवर राज्यसभेत जाणार आणि नंतर भाजप आणि गौतम अदानी यांना डोळे मारत बसणार, याची खात्री असल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या राज्यसभा खासदारकीत खोडा घालून ठेवलाय. तो खोडा काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यापासून राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी लॉबिंग करावे लागते आहे.
हेच वास्तव
एकेकाळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीच्या चाव्या आज एकतर दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात आहेत किंवा दिल्लीतल्याच भाजपच्या नेत्यांच्या हातात आहेत. काँग्रेस किंवा भाजप श्रेष्ठींच्या परवानगीशिवाय शरद पवार खासदार होणार नाहीत, हेच राजकीय वास्तव या निमित्ताने समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App