विशेष प्रतिनिधी
कराड : महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे, पण अशा बंधुता परिषदांतून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.The Brotherhood Council will create an atmosphere of unity in the society;
कराड येथील भवानी मैदानात आयोजित ‘बंधुता परिषद २०२६’ मध्ये शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेला भेट दिली होती. त्या पार्श्वभूमीवर बंधुता परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, आमदार अतुल भोसले, लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष डॉ. मकरंद बर्वे, स्वागत समिती सदस्य मच्छिंद्र सकटे, आदी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समाजात न्याय आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाच्या माध्यमातूनही शोषणमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी संघ कार्यरत असून, डॉ. आंबेडकरांनीही संघविरोधी भूमिका घेतली नव्हती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवरायांच्या मार्गावर गेले पाहिजे ही संघाची भूमिका राहिली आहे.”
किशोर मकवाना म्हणाले, “राष्ट्रहित सर्वोतोपरी असे सांगणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वच जाती मिटवून हिंदू एक व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. संघ स्थापनेपासूनच समरस हिंदू समाजासाठी कार्यरत आहे. प्रत्यक्ष व्यवहारातून संघ समाजात परिवर्तन करतो.”
संघाविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरविले गेल्याचे मिलिंद कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले, “विचार स्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या मंडळींनी संघाच्या व्यासपीठावर जाण्याची बंदी घातली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास होता. त्यांनी हिंसाचाराला कधीही प्रोत्साहन दिले नाही. दलित समाजानेही आता विचार करत एकात्म मानवतावादाच्या रस्त्याने जायला हवे, ज्यात अंत्योदयाचा विचार आहे. माणसाच्या मनातील असमानतेचा विचार काढण्यासाठी आपली सामाजिक समतेची लढाई ही रस्त्यावर नाही, तर लोकांच्या मनामध्ये लढायची आहे.” परिषदेचे सूत्रसंचालन वैभव डुबल यांनी केले. डॉ. बर्वे यांनी आभार मानले.
– आम्ही डॉ. आंबेडकरांच्याच मार्गावर – प्रा. सकटे
डॉ. आंबेडकरांनी कराडच्या संघ शाखेला दिलेल्या भेटीचा ‘जनता’मधील पुरावा समोर ठेवत प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “जर डॉ. आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली असेल, तर मीही त्यांच्या वाटेने का जाऊ नये? समतेच्या चळवळीत आम्ही काम करतो. आम्हाला समतेबरोबरच स्वातंत्र्य, लोकशाहीबरोबरच बंधुताही हवी आहे. संघ जर मोठ्या मनाने बंधुतेचा विचार घेऊन पुढे जात असेल तर मी त्यासोबत आहे.”
– ‘एक गाव – एक मंदिर, एक पाणवठा, एक स्मशान’ ठराव पारित
महाराष्ट्रात अंत्यविधी करताना आजही काही ठिकाणी जातीवादातून अनुचित प्रकार घडतात, जे बंधुतेला मारक ठरतात. सर्व समाजासाठी खुली असणारी सोयीयुक्त स्मशानभूमी तयार केली जावी, जेणेकरून कोणाच्याही मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, तसेच जातीवाद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी ‘एक गाव, एक मंदिर, एक पानवठा, एक स्मशानभूमी’ हा ठराव परिषदेत निलेश अलाटे यांनी मांडला. त्याला सर्वांनी एकमताने मान्यता दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App