नाशिक : कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र, पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची आता अवस्था झालीय.
एकमेकांवर केलेले आरोप – प्रत्यारोप, एकमेकांच्या पक्षांचे काढलेले वाभाडे हे सगळे विसरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत, पण त्यांचा जुना कटू इतिहासच त्यांना बोचतो आहे. त्यात भाजप मधल्या जुन्या शिवसैनिकांनी भर घातली आहे.
उद्धव आणि राज ठाकरे हे 5 जुलैला एकत्र येऊन विजय मेळावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर जुने शिवसैनिक नारायण राणे आणि राम कदम यांनी दोघांनाही कटू इतिहास टोचला. नारायण राणे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट लिहून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना शिवसेनेतून कसे बाहेर काढले?, याचे सविस्तर वर्णन केले. राज ठाकरे, गणेश नाईक नारायण राणे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मोठी करण्यासाठी ताकद दिली, पण उद्धव ठाकरेंनी त्यांनाच बाहेर काढले. आज राज ठाकरे यांना ते भाऊबंदकीच्या नात्याने परत यायचे आवाहन करत आहेत, पण बूंद से गयी वह हौद से नही आती. मराठी जनतेने उद्धव ठाकरेंना घरी बसवले. ते गमावलेले परत मिळवण्याची उद्धव ठाकरेंकडे क्षमता नाही, असे नारायण राणे यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
मराठी सक्ती मागे घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पण ही सक्ती लादण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला होता. फडणवीसांनी तो निर्णय रद्द केला. याचा जल्लोष करा, असा टोला आमदार राम कदम यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या वेळी पाकिस्तानचे झेंडे नाचविले. ते राज ठाकरेंना चालणार आहेत का?, राहुल गांधी सावरकरांवर काही बोलले, तर उद्धव ठाकरे गप्प बसतात. त्यावर राज ठाकरे काही बोलणार का?, असे सवाल राम कदम यांनी केले. बाळासाहेबांची विचार सोडलेली शिवसेना आणि मनसे यांचे समीकरण बसणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
पण जुना कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हे पाहून हे दोन्ही जुने शिवसैनिक अस्वस्थ झाले. त्यांची अस्वस्थता काही लपून राहिली नाही.
– ठाकरेंच्या गळ्यात घोंगडे टाकण्यात फडणवीस उणे
हिंदी सक्तीचा निर्णय जरी उद्धव ठाकरेंच्या काळात झाला तरी त्यातून escape root शोधण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. त्याउलट उद्धव ठाकरेंच्या गळ्यात ते घोंगडे टाकण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकार मधले मंत्री उणे पडले. हिंदी सक्तीचा निर्णय फडणवीस सरकारला मागे घ्यावा लागला, पण त्या निर्णयाचे निमित्त साधून ठाकरे बंधूंना राजकीय अस्तित्वासाठी एकत्र यायचा मोठा आधार मिळाला, ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही.
– ठाकरे बंधूंच्या ऐक्याला नाशिकमध्ये प्रतिसाद
ठाकरेंच्या फुटत चाललेल्या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांना या दोन्ही बंधूंच्या निर्णयामुळे हुरूप आला. नाशिक मध्ये ठाकरे बंधूंच्या ऐक्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या कार्यालयांमध्ये जाऊन शुभेच्छा देऊन आले. त्यांनी 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला एकत्र जाण्याचा निर्णय घेतला. ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा वापर नाशिकमध्ये चांगली राजकीय वातावरण निर्मिती करायचा निर्णय त्यांनी घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App