विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule देशातील सर्वात मोठी विमानसेवा म्हणून ओळख असलेल्या इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुणेसह देशातील अनेक विमानतळांवर उड्डाणे रद्द, अवधीपेक्षा अधिक विलंब आणि प्रवाशांच्या तक्रारींचा भडिमार वाढला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने इंडिगोवर कठोर कारवाई करावी आणि हा प्रकार कसा घडला, याची चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ही अपेक्षा कुणालाही नव्हती. यामागे जबाबदार कोण? याला उत्तर मिळालेच पाहिजे. Supriya Sule
पुणे विमानतळावरच मागील दोन दिवसांत इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाली, तर काही उड्डाणांना दीर्घ विलंब झाला. त्याचप्रमाणे बंगळुरू, हैदराबाद, कोलकत्ता या प्रमुख विमानतळांवरही हाच गोंधळ पाहायला मिळाला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काही खासदारांनाही या अव्यवस्थेचा त्रास सहन करावा लागला. सुळे म्हणाल्या की, आम्ही प्रवासीही सामान्य नागरिकांसारखेच अडकलो. अनेकांच्या घरात दु:खद घटना घडल्या होत्या, काहींसमोर विवाहाचे कार्यक्रम होते, विद्यार्थी महत्वाच्या परीक्षा किंवा मुलाखतींसाठी निघाले होते. सगळ्यांचे नियोजन आणि मेहनत कोलमडून पडली आहे. Supriya Sule
इंडिगोकडून स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, विमानतळाची व्यवस्था, कामकाजातील अडथळे आणि अंतर्गत नियोजनातील त्रुटी यामुळे हा गोंधळ झाला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे कोसळल्याने प्रश्न अधिक गंभीर बनले आहेत. एकाच विमान कंपनीकडे एवढा ताबा कसा? प्रवाशांचे जीवन आणि वेळ एका कंपनीच्या हातावर कसा सोपवायचा? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने अनेक विमान कंपन्यांना चालना दिली पाहिजे. एकाच कंपनीवर अवलंबून राहणे योग्य नाही.
त्रास आणि मानसिक धक्का कोण भरून काढणार?
प्रवाशांची आर्थिक हानीही कमी नाही. तिकिटांचे पैसे, नव्या बुकिंगचा खर्च, थांबा, राहणीमान, परतीचे पर्याय — सर्व गोष्टींत प्रवाशांचे नुकसान झाले. त्यामुळे प्रवाशांना लिखित स्वरूपात क्षमा मागणे आणि सर्वांची नुकसानभरपाई करणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे. स्वतः इंडिगोनं प्रवाशांची गैरसोय मान्य केली असून तिकिटांचे पैसे परत करण्यात येतील, असं कळवलं आहे. तथापि, प्रवाशांनी सहन केलेला त्रास आणि मानसिक धक्का कोण भरून काढणार? हा प्रश्न कायम आहे.
चौकशी निष्पक्ष, तातडीची आणि कठोर असली पाहिजे
यावर संसदेतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, सुळे यांनी सरकारकडून स्पष्ट उत्तर मागितले आहे. हा विस्कळीतपणा घडलाच कसा? यात गोंधळच नाही तर बेफिकिरीही दिसते. ही चौकशी निष्पक्ष, तातडीची आणि कठोर असली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. देशात प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि विश्वासू सेवा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी बजावले. आता केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार आणि इंडिगोने यापुढे कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App