विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर भावनिक आघात झाला असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, शरद पवारांची प्रकृती आता स्थिर आणि चांगली आहे, तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. आज एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे प्रचंड दु:ख आहे. दादांचं वय जाण्याचं नव्हतं. ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आल्याचेही त्यांनी नमूद केले.Supriya Sule
रोहित पवार यांनी 12 तारखेला काही खुलासे करणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, सुप्रिया सुळे यांनी अतिशय संयत प्रतिक्रिया दिली. दादाच राहिले नाहीत, कुणाबद्दल जुनं काय काढायचं? असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, रोहितची अस्वस्थता स्वाभाविक आहे आणि कुटुंब सध्या कठीण काळातून जात आहे. आम्ही एकमेकांना आधार देत पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात पारदर्शक चौकशी होईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही त्यांनी नमूद केले.Supriya Sule
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी 1500 जलस्रोतांचे पुनरुज्जीवन; टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनचा पुढाकार
सुळे यांनी कुटुंबातील वातावरणाबद्दल बोलताना म्हटले की, एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. या वाक्यातून घरातील भावनिक स्थिती त्यांनी स्पष्ट केली. अजित पवार यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव प्रत्येक क्षणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब एकत्र राहून या प्रसंगाला सामोरे जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, रेवतीच्या लग्नाबाबतही सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे लग्न अजित पवार जिवंत असतानाच त्यांच्या आशीर्वादाने ठरले होते. दादा असते तर या लग्नाची घोषणा त्यांनीच केली असती, असे त्या म्हणाल्या. पुढे काय होईल ते दादांच्या इच्छेनुसार आणि आशीर्वादानेच पाहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दु:ख आणि आनंद अशा मिश्र भावनांमध्ये कुटुंब पुढे जात असल्याचे त्यांच्या शब्दांतून स्पष्ट झाले.
चौकशीची वाट पाहणे योग्य ठरेल
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली सविस्तर प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अपघाताऐवजी घातपाताचा दावा करत विविध मुद्दे आणि संदर्भ मांडले आहेत. या संपूर्ण घडामोडीत पवार कुटुंबातील इतर सदस्यांकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नसताना, सुळे यांनी दिल्लीतून बोलताना संयत भाषेत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चौकशीचे आश्वासन दिले असून, त्या चौकशीची वाट पाहणे योग्य ठरेल.
रोहित यांनी मांडलेली भूमिका अस्वस्थतेतून
सुळे म्हणाल्या की, रोहित पवार यांची अस्वस्थता समजण्यासारखी आहे. अनेक प्रश्न आहेत, पण त्यांची उत्तरं मिळत नाहीत. काय घडलं, कसं घडलं, आपण वाचवू शकलो असतो का, असे प्रश्न त्याच्या मनात आहेत, असे त्यांनी नमूद केले. रोहित यांनी मांडलेली भूमिका ही त्यांच्या मनातील अस्वस्थतेतून आलेली असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा शब्द दिला असल्याने त्यावर विश्वास ठेवूया, अशी त्यांची भूमिका होती.
भावनिक ताणतणावामुळे प्रतिक्रिया देणे टाळले
पवार कुटुंबाकडून अधिकृत निवेदन का आले नाही, असा प्रश्न विचारला असता सुळे यांनी कुटुंबीयांच्या भावनिक अवस्थेचा उल्लेख केला. आमचं कुटुंब अतिशय कठीण काळातून जात आहे. आम्ही एकमेकांना आधार देत पुढे जात आहोत, असे त्या म्हणाल्या. या घटनेनंतर कुटुंबावर आलेल्या भावनिक ताणतणावामुळे सार्वजनिक प्रतिक्रिया देणे टाळले गेले, असे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.
आमच्यात जी चर्चा झाली ती आमच्यातच राहील
अजित पवारांबरोबर झालेल्या वैयक्तिक चर्चांबाबत विचारले असता सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. आज दादा आपल्यात नाहीत. त्यामुळे जुन्या गोष्टी उकरून काढायच्या नाहीत. आमच्यात जी काही चर्चा झाली ती आमच्यातच राहील, असे त्यांनी सांगितले. दादांबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी म्हटले की, ते जिथे असतील तिथे आनंदी असतील, अशी आपली भावना आहे.
मी आणि वहिनी आधीही एकत्र
दरम्यान, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्र आल्या होत्या. या संदर्भात बोलताना सुळे यांनी सुनेत्रा पवारांवर आलेल्या नव्या जबाबदारीचा उल्लेख केला. मी आणि वहिनी आधीही एकत्र राहिलो आहोत. आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे, असे त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद आणि अजित पवार नसल्याचे दुःख, या दोन्ही भावना एकाच वेळी मनात असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
अजित पवारांचे दुःख आयुष्यभर
एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू आहेत, असे म्हणत सुळे यांनी कुटुंबातील नात्यांचे भावनिक पैलू मांडले. अजित पवारांचे वय जाण्याचे नव्हते, आणि ते कधी थकलेले किंवा आजारी दिसले नाहीत, असे त्यांनी आठवले. त्यामुळे त्यांच्या जाण्याचा धक्का अजूनही मनाला पटत नाही, असे त्या म्हणाल्या. हे दुःख आयुष्यभर मनात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App