विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचे पडसाद भारतातही उमटत असून एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडर मिळण्यात अडथळे येत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. मात्र सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.Supriya Sule
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातील अनेक भागांत एलपीजी पुरवठ्याबाबत अडचणी दिसत आहेत. बारामती आणि शिरूर परिसरात गॅसचा तुटवडा स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत सरकारने तुटवडा नाही असे का सांगितले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एलपीजी वितरणाची संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्यासारखी परिस्थिती आहे. या विषयावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणीही आम्ही केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.Supriya Sule
सुळे यांनी पुढे सांगितले की, आपण सरकारवर आरोप करण्यासाठी नव्हे तर वास्तव मांडण्यासाठी बोलत आहोत. माध्यमांनीही कोणत्याही दबावाला बळी न पडता परिस्थिती दाखवून दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. आज देशातील सामान्य नागरिक आणि गृहिणी मोठ्या अडचणीत आहेत. वास्तविक परिस्थिती लपवून ठेवण्यापेक्षा सरकारने पुढे येऊन सत्य स्वीकारावे आणि योग्य उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
गॅसच्या कमतरतेमुळे अनेक व्यवसायांवरही परिणाम होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. बारामती परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत नसल्यामुळे काही उद्योग अडचणीत आले आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक ठिकाणी कामगारांची संख्या कमी करण्यात आली आहे. काही ठिकाणी सुमारे पंच्याहत्तर टक्के कामगार कमी केल्याचेही त्यांनी नमूद केले. बारामती, पुणे, नाशिक, बीड, जळगाव आणि नागपूर या भागांतही अशीच परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला. पूर्वी सिलिंडरसाठी रांगा लावून गॅस मिळत होता, मात्र आता तोही मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानू
याशिवाय गॅस टंचाईमुळे लग्नसमारंभांसारख्या कार्यक्रमांमध्येही अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार सांगत असलेले चित्र आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठा फरक असल्याचा आरोप त्यांनी केला. कितीही डोळेझाक केली तरी ही समस्या लपून राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बारामतीकरांना गॅसचा पुरवठा सुरळीत झाला तर आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानू, असेही त्यांनी नमूद केले. हा राजकीय मुद्दा नसून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवून या विषयावर तोडगा काढावा आणि विधानसभेत अधिकृत निवेदन करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार नाही
दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. बारामतीची जागा आम्ही लढवणार नाही आणि सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यापूर्वीही आपण ही भूमिका मांडली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाविकास आघाडीचीही बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हाके निवडणूक लढवणार असल्याची चर्चा
दरम्यान, बारामतीतील पोटनिवडणूक लक्ष्मण हाके यांनी लढवावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून पुढे येत आहे. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयाला अजित पवार यांचे नाव देण्यात आल्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे धनगर समाजामध्ये दोन गट निर्माण झाल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावर काही समर्थक पोटनिवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App