नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजितदादांची “चूक” काढताच सुनील तटकरे यांनी गंभीर इशारा दिला. या गंभीर इशार्याचा अर्थ एवढाच की शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणात मोठा खोडा घालून ठेवला.
राष्ट्रवादी मासिकाच्या शशिकांत शिंदे यांनी लेख लिहून अजित पवारांना आदरांजली वाहिली पण ती वाहताना शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची खोडी काढली. अजित पवारांनी म्हणे अदृश्य शक्तीच्या दबावाखाली चूक केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र काढून दुसरी वाटचाल सुरू केली. ही चूक त्यांना उमगली होती म्हणून त्यांनी गेल्या चार-पाच महिन्यांपासून ती चूक सुधारत आणली होती. दोन्ही राष्ट्रवादींना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्र सामोरे जायला लावले होते. विलीनीकरणाची चर्चा सुद्धा अशीच पुढे चालली होती, पण मध्येच अजितदादांची अकाली एक्झिट झाली म्हणून ती चर्चा थांबली, पण अजितदादांची अखेरची इच्छा पूर्ण करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, असे शशिकांत शिंदे यांनी त्या लेखात लिहिले.
सुनील तटकरेंचे परखड उत्तर
शशिकांत शिंदे अजितदादांच्या अखेरच्या इच्छेवर भर देण्यापेक्षा त्यांची भाजपा बरोबर जाण्याची “चूक” काढली. या लेखातून शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना डिवचले. शशिकांत शिंदे यांच्या लेखावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप बरोबर जावे ही भूमिका पवारांनी 2014, 2016 – 17, 2019, 2022, 2023 या सर्व वर्षांमध्ये घेतली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार स्थिर राहू शकते, असे अजित पवार नेहमी म्हणायचे. त्यांच्याच भूमिकेला अनुसरून आम्ही भाजपबरोबर गेलो, म्हणून तर मतभेद झाले. दोन पक्ष तयार झाले. शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची “चूक” म्हणणे हे गैर आहे. त्यांनी तसे का लिहिले हे त्यांनाच माहिती त्यांच्या हेतूंविषयी शंका आहे इथून पुढे त्यांनी तसे काही लिखाण केले किंवा तसे काही बोलले, तर त्यांना योग्य शब्दांमध्ये आम्ही निश्चित उत्तर देऊ, पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय सध्या आमच्या समोरच नाही आम्ही भाजप बरोबर आहोत. भाजपबरोबर कायम राहणार आहोत. भाजपला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असा स्पष्ट खुलासा सुनील तटकरे यांनी केला. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेचा हवाला दिला.
राष्ट्रवादींचे विलीनीकरण दूर
शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखाला सुनील तटकरे यांनी थेट उत्तर दिल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणखी दूर गेल्याचे स्पष्ट झाले. कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार बोलायला तयार नसताना इतर नेतेच जास्त बोलताहेत. निर्णयाचे अधिकार पवार यांच्याच घरात असताना रोहित पवार वगळता त्यांच्याच घरातले सदस्य बोलत नाहीत आणि इतर नेते बोलतायेत यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हा विषय बासनात गुंडाळल्यात गेल्याचेच स्पष्ट दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App