विनायक ढेरे
नुसते फुटीरांचे आकडे सांगून आणि बातम्यांच्या पुढे सोडून कोणतेही राजकीय भूकंप होतात का??, हा प्रश्न गेल्या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या घडामोडींवर आधारित आहे. महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार अजितदादा पवार 19 आमदारांसह फुटणार अशा बातम्या काल चालल्या. त्या आकड्यांमध्ये आज 30 पर्यंत भर पडली. म्हणजे 30 आमदार फुटणार असल्याची बातमी आली. पण मूळात प्रश्न हा आहे, की नुसते फुटीरांचे आकडे सांगून किंवा वाढवून आणि बातम्यांच्या पुड्या सोडून महाराष्ट्रातच काय पण देशात इतरत्र राजकीय भूकंप झाल्याची उदाहरणे तरी आहेत काय?? तर त्याचे उत्तर राजकीय अनुभवाअंती “नाही” असेच आहे!! So called ajit Pawar’s rebellion only in news of half hearted marathi media
महाराष्ट्रातल्या दोन सर्वांत महत्त्वाच्या राजकीय घटना याच्या साक्षीदार आहेत.
फडणवीस – अजितदादा शपथविधीची भनक तरी लागली होती का??
2019 मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी “पहाटे” 8.00 वाजता शपथ घेतली होती, त्याच्या आधी मराठीच नव्हे, तर हिंदी आणि इंग्रजी माध्यमांना देखील किंवा त्यातल्या तथाकथित कसलेल्या पत्रकारांना देखील त्या भूकंपाची साधी जाणीवही झाली नव्हती. एकाही न्यूज चॅनेलने, वर्तमानपत्राने किंवा सोशल मीडिया वेब पोर्टलने “बिग ब्रेकिंग”, “भूकंप”, “महाभूकंप” असे शब्द वापरून प्रत्यक्ष फडणवीस – अजितदादा शपथविधीच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्या शपथविधी संदर्भात साधे सूचक ट्विट अथवा छोटी बातमीही दिली नव्हती. खरं म्हणजे एकाही तथाकथित बड्या पत्रकारांना या शपथविधीची साधी भनक देखील लागली नव्हती. त्यामुळे त्याची बातमी ते देऊ शकले नव्हते.
अर्थातच फडणवीस – अजितदादा शपथविधीचा “भूकंप” झाल्यानंतर अनेकांना आपल्या राजकीय विश्लेषणाचे “बौद्धिक वाफारे” सोडावे लागले होते.
शिंदेंच्या बंडाची तरी चुणूक दिसली का??
जे 2019 चे तेच 2022 जूनचे. राज्यसभा निवडणूक झाली. विधान परिषद निवडणूक झाली. विधान परिषदेचे मतदान संपताच एकनाथ शिंदेंसकट शिवसेनेचे 12 आमदार महाराष्ट्रातून सुरतला गेले. तोपर्यंत एकाही बड्या पत्रकाराला, विधिमंडळाचे रिपोर्टिंग करणाऱ्या न्यूज चॅनलच्या पत्रकारांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाची भनकही लागली नव्हती. राज्यसभा आणि विधान परिषद निकालांवरून “काहीतरी गडबड” होणार या पलीकडे कोणालाही “कोण गडबड” करणार??, याच्या नावाचा अंदाजही आला नव्हता. तशा बातम्याही कोणी दिल्या नव्हत्या. म्हणजे तशा बातम्या देण्याची त्यांची खरी क्षमताच नव्हती.
सुरतला पोचल्यावर शिंदेंचे बंड जाहीर
एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचे विधान परिषद निवडणुकीतील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या माध्यमांनी जाहीर केले. त्यानंतरही सगळ्यांनी विद्वत्तापूर्ण विश्लेषणाचे “बौद्धिक वाफारे” सोडले होते.
अजितदादांच्या बंडाच्या बातम्या
आता गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात भूकंप होणार. अजितदादा 19 आमदारांसह राष्ट्रवादी फोडणार. त्यामध्ये 11 आमदारांची भर घालून 30आमदारांपर्यंत राष्ट्रवादी पुन्हा फुटणार वगैरे बातम्यांचा सर्व प्रसार माध्यमे रतीब घालत आहेत.
“बौद्धिक वाफारे” सोडून बंड होतील का?
प्रसार माध्यमांनी बातम्या देऊन विश्लेषणाचे “बौद्धिक वाफारे” सोडून जर बंड होत असते?, राजकीय भूकंप होत असते? सरकारी इकडूनची तिकडे होत असती, तर काय हवे होते?? तथाकथित ब्रेकिंग न्यूज वाल्यांची आणि “बौद्धिक वाफारे” सोडणाऱ्यांची केवळ “पवारबुद्धी”मुळे तेवढी क्षमताच उरलेली नाही, की ते भविष्यात घडणाऱ्या राजकीय भूकंपाचा खरा अंदाज बांधू शकतील आणि त्यावर आधारित काही बातम्या देऊन त्यावर खरे विश्लेषण करू शकतील!! तमाम मराठी माध्यमांची ही खरी शोकांतिका आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App