नाशिक : शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलिनीकरणाची मराठी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे, कारण ती स्वतःच शरद पवारांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जालन्यामध्ये एक वेगळेच वक्तव्य करून त्याला राजकीय राजकीय फोडणी दिली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्या आणि त्यांनी NDA ला पाठिंबा दिला, तर त्यांचे स्वागतच आहे. पण शरद पवार हे आधीपासूनच NDA सोबत असते, तर ते कदाचित राष्ट्रपतीही झाले असते, असे ज्यादाचे वक्तव्य रामदास आठवलेंनी केले. पण आठवले यांच्या याच वक्तव्यामुळे त्यांनी शरद पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की जखमेवर मीठ चोळले??, असा सवाल समोर आला.
कारण एकतर शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची गेल्या 34 वर्षांपासूनची इच्छा आता राजकीय चेष्टेचा विषय बनून राहिली. कुणीही यावे आणि पवारांना पंतप्रधान करण्यासंबंधी बोलावे, अशी त्यांच्या पक्षातल्याच नेत्यांनी देखील त्यांची अवस्था करून ठेवली. त्यातच मराठी माध्यमांनी मोदी आणि शरद पवार यांच्यातले “राजकीय गुळपीठ” लक्षात घेऊन अगदी 2017 पासून पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या बातम्या वेगवेगळ्या प्रकारे शिजवत ठेवल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांना राजकीय गुरू मानतात म्हणून ते पवारांना राष्ट्रपती करून गुरुदक्षिणा देणार. त्याचबरोबर विरोधी पक्षांमध्ये कायमची राजकीय मेख मारून ठेवणार, अशी चर्चा त्यावेळी मराठी माध्यमांनी चालविली होती. पण प्रत्यक्षात मोदींनी रामनाथ कोविंद यांच्यासारखा surprise candidate उभा करून त्यांना राष्ट्रपती पदावर निवडून आणले. मोदींनी व्यक्तिगत पातळीवर पवारांचा सन्मान नेहमीच केला, पण त्यामध्ये राजकारणाची फारशी सरमिसळ होऊ दिली नाही. भाजप सोडून अन्य कुठल्या पक्षाच्या नेत्याला त्यांनी राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती पदावर संधी दिली नाही त्याही पलीकडे जाऊन पवारांसारख्या अतिमहत्त्वाकांक्षी नेत्याला आपल्या डोक्यावरच्या पदावर बसू देणे म्हणजे नेमके कोणते “राजकीय संकट” स्वतःवर ओढवून घेणे, हे मोदींना पक्के माहिती होते. त्यामुळे मोदींनी पवारांना राष्ट्रपतीपदाची संधी देणे शक्यच नव्हते, तशी ती त्यांनी दिलीही नाही.
2022 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शरद पवारांना ज्येष्ठतेचा सन्मान ठेवत त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा देखील केली होती. पण राष्ट्रपती भवनात जाऊन inactivate होण्यापेक्षा आपल्याला active politics मध्ये रस आहे असे सांगून पवारांनी त्यावेळी विरोधकांची राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारली होती. अर्थात ती उमेदवारी स्वीकारली असती, तरी पवारांना सगळ्या विरोधी पक्षांची मते मिळाली असती, पण बहुमताच्या आकड्याच्या खेळात पवार राष्ट्रपती पदावर मात्र निवडून येऊ शकले नसते. त्यामुळे स्वतःच उमेदवारी नाकारून पवारांनी सव्वा लाखाची राजकीय मूठ झाकून ठेवली.
– दिल्लीत पवारांची उडी तोकडी
एवढ्या सगळ्या घडामोडींमध्ये पवार ना कधी पंतप्रधान झाले, ना राष्ट्रपती झाले. त्यांची राजकीय उडी संरक्षण मंत्रालयापर्यंत पोहोचली आणि नंतर कायमची खाली आली. आज ते राज्यसभेत खासदार आहेत. पवारांचा हा सगळा इतिहास रामदास आठवले यांच्या डोळ्यासमोर घडला, पण तरीही आज अचानक रामदास आठवले यांनी पवारांच्या राष्ट्रपतीपदाचा जुना विषय काढला. पण त्यामुळेच एवढा जुना विषय काढून त्यांनी पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की जखमेवर मीठ चोळले??, असा सवाल तयार झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App