सशक्त लोकशाहीत विरोधकांची सुद्धा संवाद हवा, असे पालुपद शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोलापूर दुसऱ्यांदा लावले. पण या संवादातून सगळ्या डगरींवर हात पाय ठेवण्याची सोय त्यांनी करून घेतली.
– चिडलेल्या राऊतांना प्रत्युत्तर
कालच त्यांनी सशक्त लोकशाहीतल्या संवादाचे समर्थन केले होते. त्याला विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या गुप्त भेटीचे निमित्त ठरले होते. पण या भेटी गाठी तेवढ्यापुरत्याच ठरल्या नाहीत. पवारांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नाच्या निमित्ताने विधिमंडळात येऊन बैठकीत भाग घेतला आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन आमदारांशी चर्चा केली. त्यामुळे संजय राऊत चिडले आणि त्यांनी थेट शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवरच ठळक प्रश्नचिन्ह लावले. संजय राऊत यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर संताप व्यक्त केला. संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी सशक्त लोकशाहीतल्या संवादाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेणे यात त्यांना काही वावगे वाटले नाही. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या भेटीची सुद्धा आठवण करून दिली. अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पंधरा दिवसांनी ठाकरेंची टीम त्यांना भेटून गेली होती. त्याचा आम्ही कुठला वेगळा अर्थ काढला नव्हता. कारण सशक्त लोकशाहीत संवाद आवश्यक आहे असेच माझे पहिल्यापासूनचे मत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
– राजकीय हतबलता
त्याच वेळी गेली १२ वर्षे मी माझ्या केंद्रीय मंत्रीपदाचा शपथविधी ऐकते आहे, पण त्या बद्दल आमच्याशी कुणी बोलत नाही आणि आम्हीही कुणाशी बोलत नाही, असाही खुलासा त्यांनी केला.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यातून एकाच वेळी राजकीय चतुराई आणि राजकीय अपरिहार्यता किंबहुना राजकीय हतबलता दिसून आली. सशक्त लोकशाहीत जनतेने विरोधी बाकांवर बसायला लावल्यानंतर सत्ताधार्यांशी संवाद साधण्यासाठी त्या दुसरे करणार तरी काय??, हा सवाल सुद्धा या निमित्ताने समोर आला.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सत्तेशिवाय तडफडणारा मासा झाला. शरद पवार आणि त्यांच्या अनुयायांनी जंग जंग पछाडले तरी भाजपचे केंद्रीय नेते पवारांना आणि त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसूच द्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची तडफड झाली आणि ती वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रकट झाली. याच दरम्यान अजित पवार यांच्या अकाली एक्झिट सह बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. ़त्यातून सुनेत्रा पवार या सुद्धा उपमुख्यमंत्री झाल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर कब्जा करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला.
– तत्त्वज्ञानाचे डोस
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि आमदार फोडायला नकार दिला. याचा अर्थच त्यांनी शरद पवार यांना सत्तेच्या केंद्रापासून बाजूलाच ठेवले. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंच्या फुटीर खासदारांना सत्तेचे गाजर दिले, पण पवारांच्या खासदारांना सत्तेचे मृगजळच दाखविले. सत्तेसाठी पवारांची गरज नाही आणि गरज भासल्यास पवार वगळून त्यांचे खासदार तात्पुरते बरोबर घेता येतील हे फडणवीस यांनी राजकीय कृतीतून दाखवून दिले. भाजपचे हे सगळे राजकारण लक्षात घेऊनच मग सुप्रिया सुळे यांना तत्त्वज्ञानाचे डोस प्यावे लागले आणि समोरच्यांना पाजावे लागले. म्हणूनच मग सशक्त लोकशाहीत विरोधकांशी संवाद हवा, असे बोलावे लागले. कारण त्याखेरीज दुसरे काही करण्यासाठी त्यांच्यासाठी शिल्लक उरलेच नाही.
– नवे राजकीय सूत्र
पण लोकशाहीत अशा संवादातून एकाच वेळी सगळ्या डगरींवर हातपाय ठेवता येतात हे सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आले किंबहुना तो गुरु उपदेश त्यांच्या पिताश्रींनी त्यांना केला. तोंडी सशक्त लोकशाहीचा संवाद आणि सगळ्या डगरींवर हात पाय!!, हेच पवारांचे नवे राजकीय सूत्र या निमित्ताने उघड्यावर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App