विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पवारांच्या आयुष्यातला राजकीय तळ गाठल्यानंतर एकीकडे शरद पवारांनी मारकडवाडीत अराजकी आंदोलनाला बळ दिले, पण दुसरीकडे त्यांच्या 8 खासदारांना आता सत्तेच्या वळचणीचे वेध लागलेत. सत्ता नसल्याने पवारांच्या खासदारांचा जीव तळमळतो आहे त्यामुळे लवकरच पवारांचे 8 पैकी काही खासदार राजीनामे देऊन भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवून लोकसभेत पोहोचायची तयारी करत आहेत.
आपल्या खासदारांना पक्षातच रोखायचे सोडून शरद पवार मात्र मारकडवाडी सारख्या अराजक निर्माण करणाऱ्या आंदोलनाला बळ देत असून दुसरीकडे पराभूत उमेदवारांच्या बैठका घेत ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVMs विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घ्यायच्या तयारीत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे आठ खासदार निवडून आले असले तरी केंद्रात सत्तेवर मात्र मोदीच पुन्हा आले. त्यामुळे 8 खासदारांची सत्तेची भूक पवारांना भागवता येणार नाही हे स्पष्ट झाले. त्या पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पवारांचा दारुण पराभव झाल्याने सत्ता नावाची संजीवनी पवारांच्या राष्ट्रवादी पासून आणखी दूर गेली. सत्तेशिवाय राष्ट्रवादी म्हणजे पाण्याशिवाय मासा. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आठही खासदारांना सत्तेची भूक लागली. विरोधी पक्षात बसण्याऐवजी सत्तेची भूक वाढवण्याची चटक त्यांना मूळात शरद पवारांनीच लावली. त्यामुळे त्या सवयीनुसार आता सत्तेच्या वळचणीला जाऊन बसायची पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी तयारी चालवल्याची बातमी समोर आली आहे.
बाकी भाजपच्या प्रवीण दरेकर वगैरे नेत्यांची यासंदर्भातली वक्तव्य माध्यमांमध्ये आलीच आहेत. त्या पाठोपाठ विद्या चव्हाण या पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचे इन्काराचे वक्तव्य देखील माध्यमांनी प्रकाशित केले आहे. पण त्या पलीकडचे राजकीय सत्य हेच आहे, की आता महाराष्ट्रातील सत्ता पवारांच्या राष्ट्रवादीला मिळत नाही. केंद्रातली सत्ता पवारांपासून फारच दूर आहे. त्यामुळे आता भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याखेरीज पवारांच्या खासदारांना दुसरा तरणोपाय नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App