विशेष प्रतिनिधी
बीड : शिक्षकी किंवा तत्सम पेशाची नोकरी करणारे एक पापभिरू कुटुंब. घरातील तरुण मुलीवर गुंडांची नजर पडते. कुटुंब हादरून जाते पण या गुंडशाहीपुढे दाद मागायची तरी कोणाकडे हा प्रश्न. शेवटी घडायचे तेच घडते. मुलीचा जळून मृत्यु होतो. हत्या की आत्महत्या शेवटपर्यंत समजत नाही. पण या झटक्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते.
चित्रपटातील गुंडगिरीची दाहकता दाखविण्यासाठी एखाद्या तरुणीवर त्या भागातील गुंडाची नजर पडल्यावर कुटुंब कसे देशोधडीला लागते याची करून कहाणी दाखविली जाते. गंगाजल नावाच्या हिंदी चित्रपटात एका राजकीय नेत्याच्या मुलाने ठेकेदारी करत संपूर्ण शहर वेठीस धरलेले असते. एका मुलीच्या मागे लागून तिच्या कुटुंबाला तो नरक यातना देत असतो. अनेक हिंदी चित्रपटांत एखाद्या पांढरपेशा कुटुंबात तरुण मुलगी असल्यावर गुंडांकडून कसा त्रास दिला जातो याचे चित्रण केलेले दिसते. पण भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी ज्या चेतना कळसे प्रकरणाचा उल्लेख केला ते त्यापेक्षाही भयानक आहे. ते ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
सुरेश धस यांनी विधानसभेत संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली हे सविस्तर सांगितल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या खून प्रकरणाचे गांभीर्य त्यानंतर वाढले. धस यांनी चेतना कळसे प्रकरणाबाबत सविस्तर सांगितले नसले तरी जी माहिती दिली आहे ती खूपच हृदयद्रावक आहे. सुरेश धस यांनी सांगितले की, चेतना कळसेचे वडील कला शिक्षक होते. चेतना कळसेचा जळून मृत्यू झाला. ती जळून मरण पावली की तिला जाळलं? त्या भागातील लोकांना विचारलं, तर ते काय झालं ते सगळं सांगतील.
त्यानंतर या कुटुंबाची कशी वाताहत झाली हे धस यांनी सांगितले. ते ऐकल्यावर आपण सुसंस्कृत म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात राहतो की अजूनही सरंजामी व्यवस्था असणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहारमधील एखाद्या छोट्या शहरात राहतो हा प्रश्न पडतो. सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे चेतनाच्या निधनाचा वडिलांनी धसका घेतला. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आईला वेड लागलं. तिला येरवड्यात ठेवण्यात आलं. भाऊ गायब झाला. बहीण कुठेतरी बॉर्डरवर कोणत्यातरी राज्यात आहे. ती अजून सापडत नाही.कळसे कुटुंबाची अशी वाताहत झाली.
हे प्रकरण कधी घडले हे धस यांनी सांगितले नाही. या गंभीर प्रकरणाबाबत माध्यमांमध्ये धस यांनी उघड करेपर्यंत एक शब्दही छापून आलेला सापडत नाही. काही माध्यमांनी हे प्रकरण उघड झाल्यावर चेतना कळसे कुटुंबाचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण त्यांना माहिती मिळाली नाही. सुमारे 25 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असल्याचे परळीतील काही जण म्हणत आहेत. एका शिक्षकाचे कुटुंब देशोधडीला लागले. पण त्याची दखलच घेतली गेली नाही किंवा दाबून टाकण्यात आले.
सुरेश धस यांनी त्यानंतर जे सांगितले ते अधिक महत्वाचे आहे. चेतना कळसे प्रकरणाची ना पोलिसांनी दाखल घेतली ना माध्यमांसमोर ही माहिती आली. त्यामुळेकळसे प्रकरणामुळे आरोपींच्या मनात भीतीच उरली नाही. मग संगीत दिघोळे, किशोर फड, आंधळे, गायकवाड असे अनेकांचे खून पडत गेले. धस हे एक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी एव्हढे भयानक प्रकरण उघड केले आहे. ते खोटे असेल तर पोलिसांनी आणि परळीतील नेत्यांनी जाहीरपणे असे काही घडल्याचा जाहीर इन्कार करायला हवा. तो केला नाही तर महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारा हा प्रकार घडला आहे असेच समजले जाईल. महाराष्ट्र नव्हे तर आपण बिहार, उत्तर प्रदेश सारखेच गुंडांच्या दहशतीत राहतोय हे मानावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App