नाशिक : काँग्रेसने फक्त नेते पोसले, संघटनेकडे केले. दुर्लक्ष सतेज पाटलांच्या तोंडून बाहेर आले सत्य!! सतेज पाटलांनी एका मुलाखतीत काँग्रेस विषयी परखड मते व्यक्त केली. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसने फक्त नेते पोसल्याचे सांगितले. त्याचवेळी काँग्रेसचे संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचेही कबूल केले.
सतेज पाटील म्हणाले :
काँग्रेस सत्तेवर होती. त्यामुळे काँग्रेसकडे भरपूर नेते होते. नेते आपापल्या भागांमध्ये प्रबळ झाले. परंतु सत्ता गेल्यानंतर प्रत्येक नेत्याने आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने सत्तेचा मार्ग चोखाळला. यामध्ये संघटना कमकुवत झाली. राहुल गांधींना हे सत्य उमजले. त्यामुळेच त्यांनी संघटनेकडे लक्ष देऊ शकणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकली कारण त्यावेळी नेते आणि कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करत होते. पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक नेत्यांनी आपापले पाहिले. त्यामध्ये संघटनेकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम काँग्रेसला पराभवाच्या रूपाने बघावा लागला.
राहुल गांधींनी काँग्रेसचे हे राजकीय दुखणे बरोबर ओळखले. काँग्रेस हा विचारधारा मानणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे कार्यकर्ते आहेत पण नेते आपापल्या मार्गाने सोयीचे राजकारण करतात त्याचा फटका काँग्रेसला बसतो हे राहुल गांधींनी नीट ओळखले. काँग्रेसची विचारधारा मजबूत केली पाहिजे कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे हे राहुल गांधींनी लक्षात घेतले. त्याचे परिणाम आगामी काळात चांगले होतील.
सतेज पाटलांनी आपल्या मुलाखतीतून काँग्रेसमधले सत्यच बाहेर आणले. काँग्रेसच्या सत्तेभोवती नेत्यांचे मुंगळे गोळा झाले होते. त्यांचा काँग्रेसच्या विचारधारेशी काहीही संबंध नव्हता. ते आपल्या पद्धतीने काँग्रेस चालवत होते. काँग्रेसची सत्ता गेल्याबरोबर हे मुंगळे दूर पळाले. त्याचा परिणाम नेत्यांच्या पेक्षा काँग्रेसच्या संघटनेला जास्त भोगावा लागला. विशिष्ट जनमताचा पाठिंबा असताना देखील काँग्रेसला संख्यात्मक पातळीवर यश मिळवता आले नाही. काँग्रेसने जर विचारधारा पक्की केली मध्यम मार्ग अवलंबला तर आजही काँग्रेसला विचारणारा मतदार आहे आणि तोच काँग्रेसला सत्तेपर्यंत नेऊन पोचवू शकतो, हे राजकीय सत्य सतेज पाटलांनी स्वतःच्या मुखातून सांगितले.
प्रश्न फक्त अंमलबजावणीचा
राहुल गांधींनी ओळखलेले काँग्रेसचे दुखणे आणि सतेज पाटील यांनी सांगितलेले राजकीय सत्य हे अचूक असले तरी प्रश्न राहुल गांधी आणि सतेज पाटील यांच्या धोरण अंमलबजावणीचा आहे. काँग्रेसची विचारधारा मजबूत केली पाहिजे हे मुलाखतीत सांगणे निराळे आणि तिची अंमलबजावणी करणे निराळे. काँग्रेसच्या मूळ मध्यम मार्गी विचारधारेचे रूपांतर डाव्या विचारांमध्ये करून इस्लामिस्टांना पोसल्याने काँग्रेसचे नुकसान झाले याचीही कबुली कधीतरी राहुल गांधी आणि सतेज पाटील यांनी दिली पाहिजे. ती सुद्धा नुसती कबुली देऊन भागणार नाही, तर प्रत्यक्ष मध्यम मार्गी विचाराची अंमलबजावणी केली पाहिजे, तरच काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर चांगले दिवस येऊन ती पुन्हा सत्तेकडे मार्गक्रमणा करू लागेल. अन्यथा मुलाखतीत मधल्या कबुल्या जशाच्या तशाच राहतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App