विशेष प्रतिनिधीं
छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला स्वयंस्फूर्तीने उभे राहिले होते. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत होता. मात्र, आता काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून आंदोलनाला राजकीय रंग देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर टीका करत आंदोलनाच्या मूळ उद्देशापासून लक्ष विचलित होत असल्याचा दावा केला.Sanjay Shirsat
शिरसाट म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आता विविध राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत. व्यासपीठावर जाऊन भाषणे केली जात आहेत आणि आंदोलनाची दिशा आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न बाजूला पडत असून आंदोलनाला राजकीय स्वरूप दिले जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय किंवा अत्याचार होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, हा सर्वांचाच दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले.Sanjay Shirsat
‘विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे समर्थन नाही’
विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. “विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सरकार निश्चित काळजी घेईल,” असे त्यांनी सांगितले. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलन करत असल्याने त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंदोलनादरम्यान घडलेल्या काही घटनांमुळे आई-वडिलांची चिंता वाढली असून ती स्वाभाविक असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.
‘ठाकरे-पवारांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाचे स्वरूप बदलले’
उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक नेते आंदोलनस्थळी जात आहेत. आता राज ठाकरेही रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे आंदोलनाला राजकीय कलर मिळत असून काही पक्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला.
अण्णा हजारेंवरही टीका
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरही शिरसाट यांनी टीका केली. “आता त्यांच्या मौन आंदोलन आणि उपोषणाकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत. जिथे बोलायला पाहिजे तिथे ते मौन बाळगतात आणि जिथे मौन आवश्यक असते तिथे बोलतात,” असा टोला त्यांनी लगावला.
‘पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले असून पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे शिरसाट म्हणाले. विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात कोणतीही तडजोड होणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारची असल्याचा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर स्वतःची राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी करत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला. विद्यार्थ्यांचे भविष्य हा कोणत्याही पक्षाचा विषय नसून संपूर्ण देशाचा विषय आहे. मात्र राहुल गांधी आंदोलनाचा राजकीय कार्यक्रम बनवत असल्याची टीका त्यांनी केली.
‘हिंसक प्रवृत्तींची चौकशी व्हावी’
आंदोलनादरम्यान पोलिसांवर आणि माध्यम प्रतिनिधींवर झालेल्या हल्ल्यांचाही शिरसाट यांनी निषेध केला. आंदोलनात काही बाहेरील लोक घुसल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे, असे सांगितले. आंदोलन हिंसक होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
‘विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा’
मुंबई पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. जर हा व्हिडिओ खरा असेल आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारे धमकावले असेल, तर संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही शिरसाट यांनी केली. “पोलिसांचे राज्य नाही. विद्यार्थ्यांना धमकावणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार विचार करेल’
पेपरफुटी प्रकरणासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार निश्चितपणे विचार करेल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. मात्र आंदोलनाच्या नावाखाली राजकीय पक्षांनी स्वतःचा अजेंडा पुढे रेटू नये, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवणे हेच सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
Opposition Politicizing Student Protest: Minister Sanjay Shirsat Targets Thackeray, Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Monique Barbut : फ्रान्समध्ये कृषी कायद्याला विरोध, पर्यावरण मंत्र्यांचा राजीनामा;
- CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात मध्यस्थीच्या चर्चेसाठी मोदी सरकारने जे. पी नड्डांनाच का निवडले??; वाचा सविस्तर कारणे!!
- यालाच तर जंतर – मंतर म्हणतात; राज ठाकरेंचे मोदी – पवार भेटीवर अचूक बोट!!
- CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना सरकारचे चार वेळा चर्चेचे निमंत्रण; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे निवेदन