विशेष प्रतिनिधी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला 12 जागा देण्यात याव्यात, अशी मागणी आरपीयआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी भाजपकडे केली आहे. यासंदर्भात आठवले यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुंबईतील काही जागांवर देखील दावा केला आहे. रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी आम्हाला किमान 10-12 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे, असे वक्तव्य केले होते. तसेच विदर्भातील तीन ते चार जागा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आरपीआयचे नेते रामदार आठवले यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपावर आपले म्हणणे मांडले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेप्रमाणेच आरपीआयला देखील दोन महामंडळे द्यावीत. तसेच विधान परिषदेच्या 12 आमदारांमध्ये एक जागा आम्हाला मिळावी. यासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबईतील मालाड, धारावी यांसारख्या जागा आम्ही मागितल्या आहेत, असे आठवले यांनी सांगितले.
रामदास आठवले म्हणाले की, आमच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत 12 जागा द्याव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. माझी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण मी लढलो नाही. जागा न घेता सर्वत्र महायुतीचा प्रचार केला. मात्र विरोधकांनी संविधान बदलतील असा अप्रचार करून निवडणुकीत यश मिळवले. यावेळी मात्र तसे होणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 3 ऑक्टोबर रोजी आरपीआयचा 67 वा वर्धापन दिन आहे. सातारा येथे पक्षाचा वर्धापन सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचही उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, विधानसभेच्या 288 जागांवर भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय एकत्र लढणार आहेत. मात्र अद्यापपर्यंत महायुतीमध्ये जागा वाटपांचा निर्णय झाला नसून तिकीट वाटपावर चर्चा सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App