विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे दोघांच्या राजकीय भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागे अनेक अर्थ लावले जात आहेत. दोन्ही नेते एकत्र भेटत असल्याने मनपा निवडणुकीत दोन्ही पक्षाची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच गुढीपाडव्याच्या मेळाव्यात अटीशर्थींसह देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात ते पहावे लागणार आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे यांना आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले होते. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील सोबत आहेत. तर मनसेकडून अमित ठाकरे, मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर, मनसे नेते अभिजित पानसे उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला
राज ठाकरे यांनी मला जेवणाचे निमंत्रण दिले होते, त्यासाठी मी आलो होतो. निवडणुका झाल्यानंतर एक दोन महिन्यांपासूनच भेटायचे ठरले होते. त्यामुळे आज आमची सदिच्छा भेट होती. यावेळी स्नेहभोजनही झाले. गप्पा गोष्टी झाल्या. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. आम्ही बाळासाहेबांचे लोक आणि कार्यकर्ते आहोत. आम्ही एकत्र काम केलेले आहे. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींवर गप्पा. बाळासाहेबांच्या काळातील जुन्या घटनांवरही बरीच चर्चा झाली. अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला, ते कळले नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या काळात राज ठाकरे आमचे नेते म्हणून आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे त्या काळातील काही घडामोडी, काही आठवणी यांनाही उजाळा दिला. बाळांसाहेबांबद्दल माझ्यापेक्षा जास्तीचा अनुभव आणि आठवणी राज ठाकरेंकडे आहेत. त्याही त्यांनी चर्चेमध्ये सांगितल्या, गप्पा गोष्टी झाल्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भेटीमागे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही
या भेटीमागे राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. मुंबईतील रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत राज ठाकरे यांनी विचारणा केली. एकंदरीत विकासाच्या बाबतीत चर्चा झाली, पण कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण विश्वास ठेवा, असे एकनाथ शिंदे माध्यमांना म्हणाले.
आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही
घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी काम करणारे लोक हवेत असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App