नाशिक : देवेंद्र फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. भाजप नावाचे हे अजगर तुम्हाला कधी गिळून टाकेल ते समजणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पण 2024 च्या लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणूका आणि त्यानंतर खुद्द प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची स्थिती काय आहे??, या सवालाला त्यांनी उत्तर दिले नाही, कारण तो प्रश्नच कुणी त्यांना विचारला नाही.
प्रकाश आंबेडकरांनी आजच्या राजकीय स्थितीचे चांगले विश्लेषण केले. पहलगाम हल्ल्यापासून ते फडणवीस सरकारच्या परफॉर्मन्स पर्यंत विविध विषयांवर ते बोलले. भारताने सिंधू जल करार रद्द केलेला नाही. तसा पत्रामध्ये उल्लेख देखील नाही. जातनिहाय जनगणना हा विषय फसवा आहे, अशी वक्तव्ये प्रकाश आंबेडकर यांनी केली. राजकीय विश्लेषण म्हणून त्याला विशिष्ट महत्त्व आले, पण प्रकाश आंबेडकर की हे फक्त राजकीय विश्लेषक नाहीत, तर ते मोठे राजकीय नेते आहेत आणि वंचित बहुजन आघाडी नावाचा त्यांचा आघाडीयुक्त पक्ष आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण केले, एवढ्या पुरतेच त्यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या परीक्षेचे मूल्यमापन होऊ शकत नाही, तर त्यांच्या राजकीय परफॉर्मन्सच्या आधारे त्यांचे मूल्यमापन होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना प्रकाश आंबेडकर यांनी कितीही सावध राहायचा सल्ला दिला असला, तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत तो अंशतः किंवा पूर्णपणे स्वीकारणे शिंदे किंवा अजितदादा यांना शक्य नाही. त्याचबरोबर त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी देखील तो फारसा उपयोगी ठरण्याची शक्यता नाही.
ठाकरे + आंबेडकर युतीचे काय झाले??
पण शिंदे आणि अजितदादांना सावधगिरीचा सल्ला देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची राजकीय अवस्था कशीय??, या सवालाचे उत्तर मात्र “केविलवाणी” या शब्दानेच द्यावे लागेल. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती जाहीर केली होती. प्रत्यक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत ती आघाडी टिकलीच नाही. ठाकरे आणि आंबेडकर यांनी एकत्रित निवडणूक लढवली नाही. त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. अर्थातच त्याचा दुष्परिणाम शिवसेनेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला जास्त भोगावा लागला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात 6.98 % मते मिळाली होती त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी सहा मतदार संघांमध्ये त्यांच्या उमेदवाराच्या मतांमुळे काँग्रेस – राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फक्त 3.67 % मते मिळाली. त्यांच्या उमेदवारांचा परिणाम काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्या परफॉर्मन्सवर झाला नाही.
विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव घटला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला 6.50 % मते मिळाली होती, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी फक्त 3.60 % मतांवर येऊन ठेपली. 200 जागांपैकी 194 जागांवर डिपॉझिट गमवावे लागले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फक्त 20 जागांवर फटका बसला.
साधारण वर्ष – सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या निवडणुकांच्या परफॉर्मन्स विषयी प्रकाश आंबेडकरांना कुणी प्रश्न विचारले नाही. त्यामुळे त्यांनी त्यावर काही बोलण्याचा प्रश्न उद्भवला नाही. मात्र त्यांनी देशातल्या आणि राज्यातल्या विविध घडामोडींवर राजकीय विश्लेषण केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App