विशेष प्रतिनिधी
भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याला मोठं यश प्राप्त केलं आहे. ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रिटमेंट या त्रिसुत्रीच्या सोबतच योग्य नियोजन आणि सामुहिक प्रयत्नांच्या जोरावर जिल्हा प्रशासनाने ही किमया साधून दाखवली आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या एकमेव रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून १५ महिन्यांनी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. Positive News: Bhandara District Corona Free: Success to District Administration Efforts; Success to test and treatment triad
भंडारा जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी गराडा भागात आढळून आला. त्यानंतर रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी असला तरी जिल्ह्यात संसर्गाचं प्रमाण कमी होतांना दिसत नव्हतं. जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद १२ जुलै २०२० रोजी झाली. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. परंतू अचानक दुसरी लाट आल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने या दरम्यान योग्य नियोजन करत दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात यश संपादन केले. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, त्यांची तपासणी-चाचणी व त्यावर वेळेत उपचार या सूत्राचा अवलंब करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात आली. आज ६ ऑगस्ट रोजी शेवटचा रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि जिल्हा कोरोनामुक्त झाला. या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे १ हजार १३३ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.
आज जिल्ह्यात ५७८ व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली नाही. आतापर्यंत ४ लाख ३९ हजार ८३२ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ५९ हजार ८०९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या तर ५८ हजार ६७६ व्यक्ती कोरोनातून बऱ्या झाल्या. परंतू यानंतर जिल्बा प्रशासनाने घेतलेल्या मेहतनीमुळे जिल्ह्यात आज एकही कोरोना रुग्ण शिल्लक नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवर भंडारा जिल्ह्याने यशस्वीपणे नियंत्रण मिळवले होते. मार्च २०२१ च्या अखेरीस आलेल्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशासह जिल्ह्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्ण वाढीचा वेग १८ एप्रिल पर्यंत कायम राहीला. १२ एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजे १ हजार ५९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर १ मे रोजी सर्वाधिक ३५ मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली. त्यानंतर केलेल्या ‘ब्रेक द चेन’ व विविध उपाय योजनामुळे रुग्ण संख्या कमी कमी होत गेली. २२ एप्रिल रोजी सर्वाधिक १ हजार ५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचीच संख्या अधिक राहली आहे.
१५ फेब्रुवारी पर्यंत सक्रीय रुग्णांचा आकडा जिल्ह्यात ९७ एवढा नोंदवला गेला. त्यानंतर १८ एप्रिल पर्यंत हा आकडा थेट १२ हजार ८४७ वर पोहचला होता. कालांतराने जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून पॉजिटीव्हीटी रेटही शून्यावर आला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधीकारी संदीप कदम यांनी नागरिकांना अजुनही सावध राहण्याचा इशारा दिला असून सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलंय.
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाचे सामूहिक प्रयत्न व नागरिकांचे सहकार्य महत्वाचे ठरले आहे. आज जिल्ह्यात क्रियाशील रुग्ण शून्य असले तरी यापुढचा काळ सतर्कता बाळगावीच लागेल. थोडासाही गाफिलपणा चालणार नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नियमांचे अधिक जबाबदारीने पालन करणे आवश्यक आहे. कोरोनामुक्त झाला असला तरी मास्क वापरणे, हात स्वच्छ धूणे व सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे.
संदीप कदम – जिल्हाधिकारी भंडारा
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App