नाशिक : पवारांच्या कुटुंबातला सत्तासंघर्ष सासरा – सून, नणंद – भावजय यांच्यातला; पण त्याचे खापर मात्र प्रफुल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा आणि भाजपच्या नेत्यांवर!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आणि “पवार बुद्धीने” ग्रासलेल्या नेत्यांमधून आणि पत्रकारांकडून समोर आला.Pawar’s family fued is of their own, but blame it on others
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे जाताच शरद पवारांनी वेगवेगळ्या मार्गांनी त्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा विषय ऐरणीवर आला असताना आणि तोच तातडीचा असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा मुद्दामूध पुढे रेटला. पवारांच्या राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांनी अजित पवारांचा हवाला देऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या ऐक्याचा मुद्दा सगळ्यांत महत्त्वाचा करून ठेवला. या सगळ्या राजकारणातून सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व दोन्ही राष्ट्रवादींवर लादायचा शरद पवारांचा “डाव” होता.
– पवारांना न सांगताच…
पण सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी तो “डाव” वेळीच ओळखला आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारायचा निर्णय घेऊन बारामतीतून मुंबईकडे परस्पर कूच केले. या सगळ्या प्रक्रियेत सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी शरद पवारांशी संपर्क सुद्धा साधला नाही. शरद पवार कुठला “डाव” टाकू शकतात, याचा बरोबर अंदाज घेऊन सुनेत्रा पवारांनी परस्पर निर्णय घेतला. या निर्णय प्रक्रियेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या बरोबरीने डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी त्यांना जरूर मदत केली. पण या सगळ्यांनीच घाईगर्दी करून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायचा निर्णय घ्यायला भाग पाडले, अशी वातावरण निर्मिती शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांनी केली. त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे छगन भुजबळ, नरेश अरोरा आणि भाजपच्या नेत्यांवर ठपका ठेवला. यामध्ये जयंत पाटील, उत्तम जानकर, शशिकांत शिंदे हे नेते आघाडीवर होते. त्याच बरोबर सुषमा अंधारे आणि असीम सरोदे यांनी सोशल मीडियातून बुद्धीभेद केले. पण त्यांनी केलेली वातावरण निर्मिती पूर्ण सत्य नव्हती, तर ती अर्धसत्य होती.
– पवारांचा “डाव” सुनेत्रांनी ओळखला
कारण शरद पवारांनी टाकलेले “डाव” सुनेत्रा पवारांनी वेळीच ओळखले म्हणून त्यांनी स्वतःहूनच उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीचे प्रमुख पद स्वीकारायचा निर्णय घेतला.
– सासरा आणि सून, नणंद आणि भावजय संघर्ष
वास्तविक पवार कुटुंबामधला मूळचा संघर्ष सासरा आणि सून म्हणजेच स्वतः शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातला होता आणि आहे. त्याचबरोबर तो पवार कुटुंबावर आणि पर्यायाने राष्ट्रवादीच्या राजकारणावर कुणाचे वर्चस्व राहील??, याचाही होता आणि आहे. त्याला नणंद विरुद्ध भावजय असाही राजकीय कोन होता. आणि तो वर्षानुवर्षे पुढे चालत आलेला होता आणि आहे. शरद पवार आणि सुनेत्रा पवार, तसेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचे नाते राजकीय दृष्ट्या सौहार्दाचे कधीच नव्हते. उलट शरद पवार आणि अजित पवार यांच्यातले “राजकीय द्वैत” जसे वाढत गेले, ते वाढण्याला सुनेत्रा पवार कारणीभूत असल्याचा शरद पवारांचा “होरा” होता. शरद पवारांचा हा राजकीय संताप 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बाहेर आला होता. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या राजकीय संघर्षात शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना “मूळची पवार” असे म्हटले होते, तर सुनेत्रा पवारांना “बाहेरून आलेली पवार” असे “बिरुद” लावले होते. आपण मुलीची बाजू उचलून धरताना पवारांच्या घरात लग्न करून आणलेल्या सुनेचा अपमान करतोय, याचे भान सुद्धा त्यावेळी पवारांनी ठेवले नव्हते. त्या आधी देखील पवारांनी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असे म्हणून त्याचा अपमान केला होता.
– सुनेत्रा पवारांच्या मनातली सल
या सगळ्या गोष्टींची सल अजित पवारांच्या बरोबरच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याही मनात होती. ती सलच त्यांच्या कालच्या आणि आजच्या राजकीय वर्तणुकीतून समोर आली. सुनेत्रा पवार आणि जय पवार हे शरद पवारांची भेट न घेता किंवा त्यांना काहीही न सांगता बारामतीतून मुंबईला निघून आले. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय परस्पर घेतला. त्याची कल्पना सुद्धा शरद पवारांना दिली नाही. याचे मूळ कारण पवारांच्या घरातल्या कौटुंबिक राजकीय संघर्षात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात निर्माण झालेल्या राजकीय द्वैतामुळे आणि शरद पवार आपल्या नेतृत्वात खोडा घालत आहेत, हे लक्षात आल्यामुळे सुनेत्रा पवारांनी आपला राजकीय निर्णय परस्पर घेऊन टाकला. त्यांना फक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नरेश अरोरा यांनी मदत केली. पण शरद पवारांच्या कुटुंबातला कलह बाहेरच्या कुणीही वाढवलेला नाही. तो पवारांनी स्वतःच वाढवून ठेवलाय. त्याचाच परिणाम आज दिसला. शरद पवारांच्या गोटातल्या नेत्यांनी मात्र त्याचे खापर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, नरेश अरोरा आणि भाजपच्या नेत्यांवर फोडले.
– राजकीय द्वैतभाव वाढला
पण म्हणून सत्य बाहेर यायचे राहिले नाही. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला जय पवार सोडून पवार कुटुंबातले कुणीही हजर राहिले नाही. पवार बारामतीलाच थांबले. सुप्रिया सुळे दिल्लीला निघून गेल्या. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर सोशल मीडिया पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पण त्यातही अजितदादांची जागा त्या घेऊ शकणार नाहीत, हे उघडपणे लिहिले. त्यामुळे पवार कुटुंबातले “राजकीय द्वैत” जास्तच वाढल्याचे स्पष्ट दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App