नाशिक : महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अजोड आहे. त्याला कुणी मोडू शकत नाही, अशी भाषा मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वापरली होती. त्या भाषेत 100% जरी सत्य नसले, तरी तथ्य बरेच होते. कारण महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका व्यंगचित्रकाराने स्वतःच्या राजकीय कर्तृत्वाने ठाकरे ब्रँड विकसित केला होता. तो ब्रँड एवढा विकसित झाला होता की त्या ब्रँडच्या बळावर शिवसेना-भाजप युतीने काँग्रेस नावाच्या बलाढ्य संघटनेची सत्ता मोडीत काढत हिंदुत्ववादी पक्षांना सत्तेवर आणले होते. Thakckrey brand
मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्ये ठाकरे ब्रँडचे कायमचे वर्चस्व निर्माण झाले. हिंदुत्व हा मुद्दा गृहीत धरला, तर महाराष्ट्रात पवार ब्रँड पेक्षा ठाकरे ब्रँड कितीतरी मोठा झाला. याचे सगळे श्रेय बाळासाहेब ठाकरे नावाच्या करिष्माई नेत्यालाच द्यावे लागेल. नंतर त्या ब्रँडचा उपयोग त्यांच्या मुलाने पुतण्याने करून घेतला. पण त्या ब्रँडच्या “व्हॅल्यू” मध्ये बाळासाहेबांचा मुलगा किंवा पुतण्या फारशी भर घालू शकले नव्हते.
आता जेव्हा महाराष्ट्राची राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलून ती उजव्या हिंदूवादी पक्षांच्या हातात आली, त्यावेळी बाळासाहेबांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या हातात शिल्लक असलेला ठाकरे ब्रँड पुसट झाला, पण भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात असलेला हिंदुत्वाचा ठाकरे ब्रँड जास्त उजळ झाला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुलाखत देताना ठाकरे ब्रँड कोणी संपवू शकत नाही, असे वक्तव्य केले. हिंदुत्वाच्या परिप्रेक्ष्यात राज ठाकरेंचे विधान तथ्यावर उतरले, पण स्वतः राज ठाकरे इतर नेत्यांना ठाकरे ब्रँडची कशासाठी खेळू देत आहेत??, हा सवाल मात्र या निमित्ताने समोर आला.
– ठाकरे ब्रँडशी इतरच नेते खेळतायेत
स्वतः राज ठाकरेंना ठाकरे ब्रँडचा फार मोठा राजकीय लाभ उठवता आला नाही, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या निवडणुकांच्या आकडेवारीने सिद्ध केली. राज ठाकरे यांचे स्वतःचे वलय + त्यांचे वक्तृत्व यामुळे त्यांच्या स्वतःच्या ब्रँडची विशिष्ट “व्हॅल्यू” महाराष्ट्रात तयार झाली. त्यामुळे बाकीच्या पक्षांमधले ब्रँड तयार झाले नसलेले नेते राज ठाकरेंना भेटायला शिवतीर्थावर जाऊ लागले. राज ठाकरे ही त्यांच्याशी भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारायला लागले, पण या सगळ्या गोष्टीचा लाभ मात्र राज ठाकरेंना कधीच राजकीय दृष्ट्या झाला नाही. उलट बाकीच्या पक्षांमधल्या ब्रँड नसलेल्या नेत्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःची छाप निर्माण केली. ते राज ठाकरेंना भेटत जरूर राहिले पण त्यांना सोबत घेऊन त्यांचा मनसे नावाचा पक्ष कुठल्या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये कधी सामील केला नाही किंवा आपल्या सत्तेतला वाटा कधीच राज ठाकरेंना दिला नाही. तरी देखील राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी इतर नेत्यांना थारा देत स्वतःच्याच ठाकरे ब्रँडची व्हॅल्यू कमी करून घेतली.
– इतरांच्या नादाला लागण्यातच धन्यता
दोन ठाकरे बंधू एकत्र येणार या बातम्या हवेत पसरविल्या. प्रत्यक्षात अजून एकत्र आले नाहीत. या दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँड मोठा करण्यापेक्षा इतर ब्रँड नसलेल्या नेत्यांच्या नादी लागण्यातच धन्यता मानली. हे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी केलेल्या आघाडीतून आणि राज ठाकरेंनी वेगवेगळ्या नेत्यांच्या फक्त भेटीगाठी घेण्यातून स्पष्ट झाले. आजच्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीतून यापेक्षा दुसरा खरा अर्थ काढता येत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App