आधीच उन्हाचा कोप, त्यात कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु भारनियमनाची ही कोंडी फोडण्यासाठी महावितरणने प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.
वृत्तसंस्था
औरंगाबाद : आधीच उन्हाचा कोप, त्यात कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. परंतु भारनियमनाची ही कोंडी फोडण्यासाठी महावितरणने प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. खुल्या बाजारातून वीज खरेदी करून गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीपासून राज्यातील कृषी वीजवाहिन्यांना ८ तास वीजपुरवठा देण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सोबतच इतर ग्राहकांसाठी सुरू असलेले भारनियमन कमीत कमी राहील याची काळजी घेण्यात येत आहे.MSEDCL buys power from other sources, tries to provide 8 hours power to agricultural pumps to overcome power crisis
गुजरातकडून वीज खरेदी
दरम्यान, मागणीप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे राज्यात शुक्रवारी (दि. १५) सकाळपर्यंत कोणत्याही ठिकाणी भारनियमन करण्यात आले नाही. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णयानुसार टाटा कंपनीच्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) महावितरणने वीजखरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून गेल्या तीन दिवसांपासून अतिरिक्त स्वरूपात ६३६ मेगावॅट वीज उपलब्ध झाल्यामुळे भारनियमनातून मोठा दिलासा मिळत आहे. यासोबतच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून (एनटीपीसी) येत्या १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॅट वीजपुरवठा
सुरू राहणार आहे.
महानिर्मितीकडून १५०० मेगावॅट वीज कमी मिळतेय
महावितरणवर सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून महावितरण वीज खरेदी करीत आहे. परंतु कोळसा टंचाई व इतर तांत्रिक कारणांमुळे या वीजनिर्मिती कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. महानिर्मितीकडून १५०० मेगावॅट वीज कमी मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये केवळ चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. यासोबतच एनटीपीसीच्या सोलापूर व सीपत येथील वीजनिर्मिती प्रकल्पामधून जवळपास १२०० मेगावॅट वीज कमी मिळत आहे.
राज्यात २३०० ते २५०० मेगावॅटची तूट
राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेच्या मागणी तब्बल ३००० ते ३५०० मेगावॅटने तर मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात ही मागणी सुमारे २००० ते २५०० मेगावॅटने वाढली आहे. महावितरणची सद्यस्थितीत २४५००-२५००० मेगावॅट एवढी मागणी आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून कोळसा टंचाई व गॅसची कमतरता व इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे २३०० ते २५०० मेगावॅट तूट निर्माण झाली आहे.
इतरांकडून वीज खरेदी करून तूट भरून काढण्याचे प्रयत्न
ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून अन्य स्रोतांकडून वीज खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्याची फलश्रृती म्हणून सीजीपीएल व एनटीपीसीकडून सद्यस्थितीत १३०९ मेगावॅट वीज अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध होत आहे.
यावर उपाय म्हणून महावितरणकडून खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) २००० मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी करण्यात येत आहे. त्यातून कृषिपंपांना गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीनंतर ८ तास वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या देशभरातून वीज खरेदीला मोठी मागणी असल्याने खुल्या बाजारातील वीजदर प्रतियुनिट १२ रुपयांवर गेले आहे. या दराने वीज खरेदीची तयारी असून देखील सध्या पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App