Vinod Patil : मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही; मराठा आंदोलक विनोद पाटील यांचा पुनरुच्चार

Vinod Patil

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Vinod Patil मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही, असा पुनरुच्चार मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. कालच्या जीआरमुळे समाजाला काहीही नवे मिळाले नाही. त्यामुळे मी लवकरच सक्षम वकिलांची फौज घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे. मी समाजाचे खच्चीकरण व फसगत अजिबात होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.Vinod Patil

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक जीआर काढला. त्या जीआरद्वारे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा मराठवाड्यातील मराठा समाजाला लाभ मिळण्याचा दावा केला जात आहे. पण सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी या जीआरचा मराठा समाजाला टाचणीएवढाही फायदा होणार नसल्याचा दावा करत नव्या वादाला फोडणी दिली आहे. या प्रकरणी मनोज जरांगेंनी त्यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. पण त्यानंतरही विनोद पाटील यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे.Vinod Patil



नोंद मिळाली त्याला फायदा, मग बाकींच्याचे काय?

विनोद पाटील गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या… वारंवार सांगितले जात आहे की, 58 लाख नोंदी सापडल्या, 58 लाख नोंदी सापडल्या. परंतु यातील विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील आजच्या आहेत का? मूळ प्रश्न हा आहे की, शिंदे समितीला नव्याने सापडलेल्या नोंदी किती? मराठवाड्यात फक्त 48 हजार नोंदी सापडल्याचे सरकारात नमूद आहे. त्यानुसार 2 लाख 39 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ही स्वागतार्ह बाब असून हा ही आपला विजयच आहे. पण मग बाकीच्या मराठ्यांचे काय? त्यांचा विचार कोण करणार?

मी हे सगळे बोलत असताना मला शिवीगाळ करण्यात आली. पण जे कागदपत्रावर दिसत आहे, त्याला काय म्हणणार? मी माझा लढा आजवर जसा लढलो, तसा कायम लढणार. मी या प्रकरणी लवकरच सक्षम वकिलांची फौज घेऊन न्यायालयात दाद मागणार आहे. समाजाचे खच्चीकरण होऊ देणार नाही. फसगत तर नाहीच नाही. पुन्हा पुन्हा स्पष्ट सांगतो की, कालच्या GR मध्ये समाजाला नव्याने काहीही मिळाले नाही? कोर्टात जाऊ, सर्वांना मिळणारे आरक्षण घेऊ. तुमच्या साथीने व आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने नक्कीच यश मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

जीआरचा टाचणीभरही फायदा नाही

उल्लेखनीय बाब म्हणजे विनोद पाटील यांनी कालच या जीआरचा टाचणीएवढाही फायदा होणार नसल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली होती. तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना समोर येऊन या जीआरचा अर्थ समजावून सांगण्याची विनंतीही केली होती. ते म्हणाले होते, राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो जीआर दिला त्यात काय लिहिलंय? कुठल्याही व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर काय पुरावे लागतील? कुठलंही आरक्षण घ्यायचं असेल तर 1967 पूर्वीचा पुरावा लागतो, त्याचा उल्लेख आहे. शेतमजूर आणि भूमिहीन असतील त्यांनी काय केलं पाहिजे याचा उल्लेख आहे. त्यासाठी गृह चौकशी अहवाल लागतो. तलाठ्यांनी तो द्यायचा आणि मग प्रमाणपत्र दिलं जातं.

स्पष्टच सांगायचं झालं तर या जीआरचा टाचणीभरही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही. मी ओबीसी नेत्यांना सांगतो आहे की ते या जीआरला आव्हान देणार आहेत. कदाचित कोर्ट त्यांचं प्रकरण दाखलही करुन घेणार नाही, कारण हा निर्णय नाहीच. ही फक्त प्रक्रिया आहे आणि ती कागदावर उतरवून दिली आहे. आम्हाला सरसकटची अपेक्षा होती. कुणबी म्हणून जो जन्माला आला त्याला कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा होती.

जरांगेंचे समाधान कशाने झाले हे मला माहिती नाही

ते पुढे म्हणाले, मनोज जरांगेंचं समाधान कशामुळे झालं मला माहीत नाही. त्याबद्दल तेच उत्तर देऊ शकतील. मला जी कॉपी मिळाली की त्यात हैदराबाद गॅझेटचा उल्लेख आहे, तसंच देवगिरीचा उल्लेख आहे. त्यात असं लिहिलं आहे की ज्यांना ज्यांना वंशावळी प्रमाणे ज्यांच्याकडे पुरावे असतील जे जे मराठा कुणबी, कुणबी मराठा असतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्यांच्याकडे पुरावे नसतील आणि नातेवाईकांचे पुरावे असतील आणि त्यांच्याकडे गृह चौकशी अहवाल असेल त्याचा निर्णय स्थानिक समितीने घ्यावा. यात कुठेही लिहिलेलं नाही ज्यांच्याकडे पुरावे नाहीत जे कुणबी मराठा नाहीत, जे फक्त मराठा आहे त्यांना हे लागू होईल. त्यामुळे या जीआरचा उपयोग आम्हाला होणार नाही.

मी न्यायालयीन लढाई लढलो. त्यामुळे छाती ठोकपणे सांगतो यातून एकाचेही सर्टिफिकेट निघणार नाही. मागणारे मागत असतात, मात्र समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी मला जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे, असेही ते या प्रकरणी म्हणाले होते.

Maratha Activist Vinod Patil Repeats Maratha Community Gained Nothing

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात