विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manikrao Kokate “भाजपचे आयुष्य केवळ दुसऱ्यांची घरे फोडण्यात चालले आहे. विधानसभेला माझ्या घरातील माणूस फोडला, आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्याही घरात फूट पाडली. भाजप हा आता पूर्णपणे ‘बाटलेला’ पक्ष झाला असून, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र घरी बसले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सिन्नरमधील प्रचार सभेत कोकाटे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.Manikrao Kokate
राज्यभरातील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आरोप आणि प्रत्यारोपाने चांगलाच गाजतोय. नाशिकच्या सिन्नर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल राजे उगले यांच्या प्रचारार्थ सिन्नरमध्ये आयोजित सभेत राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधी पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत असताना मित्रपक्ष असलेल्या भाजपवरही सडकून टीका केली.Manikrao Kokate
नेमके काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
सिन्नर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना कोकाटे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून त्यांनी संताप व्यक्त केला. “माझे सख्खे बंधू भारत कोकाटे यांना भाजपने आपल्याकडे ओढले. त्यानंतर आता खासदार वाजे यांच्या कुटुंबातही त्यांनी हेच केले. दुसऱ्यांची घरे फोडून आणि माणसे पळवून पक्ष वाढवणाऱ्या भाजपमध्ये मूळच्या निष्ठावंतांना काहीच किंमत उरलेली नाही.” भाजपने कोकाटे यांच्या घरातच कमळ फुलवल्याने त्यांची ही नाराजी आता उघडपणे बाहेर आली आहे.
शिंदेंनाही सुनावले : आधी अधिकारी बदला, मग दत्तक घ्या
यावेळी माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. “गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सिन्नर नगर परिषदेचा मुख्याधिकारी (CO) बदलण्याची मागणी करत आहोत, पण नगरविकास खात्याकडून ते झाले नाही. आणि आता हेच लोक सिन्नर शहर ‘दत्तक’ घ्यायला निघाले आहेत,” असा खोचक टोला कोकाटे यांनी शिंदेंना लगावला. सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावेत, पोकळ घोषणा करू नयेत, असेही त्यांनी म्हटले.
‘लाडकी बहीण’ श्रेयवादावरून टीका
महायुतीच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या श्रेयवादावरूनही माणिकराव कोकाटे यांनी आक्षेप घेतला. “ही योजना महायुतीमधील तिन्ही पक्षांची सामुदायिक आहे. याचे श्रेय कुणा एकाने लाटू नये किंवा तसा प्रयत्न करू नये. योजनेचे यश हे तिन्ही घटक पक्षांचे आहे, हे विसरून चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला कानपिचक्या दिल्या.
2 तारखेनंतर पुन्हा मांडीला मांडी लावून बसणार
एकीकडे भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका करतानाच कोकाटे यांनी राजकारणातील वास्तवाची कबुलीही दिली. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी महायुतीचे मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, विरोधी पक्ष तर नावालाच उरलेत. आज जरी आम्ही एकमेकांवर तोंडसुख घेत असलो, तरी 2 तारखेनंतर (निकालानंतर) आम्ही पुन्हा एकत्र मांडीला मांडी लावून बसणार आहोत,” असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App