महाराष्ट्रातली नगरपालिका नगरपंचायतींची निवडणूक शिगेला पोहोचली पण तरीसुद्धा शरद पवारांनी अजून विरोधकांना “हा” सवाल का नाही विचारला??, असे त्यांनाच विचारायची वेळ त्यांच्या सध्याच्या राजकीय निष्क्रियतेतून आली. येथे शरद पवारांची राजकीय निष्क्रियता म्हणजे त्यांचे केवळ गप्प बसणे नव्हे, कारण शरद पवार जेव्हा गप्पा असतात, तेव्हाच ते सगळ्यात जास्त सक्रिय असतात, हे राजकीय वास्तव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. Maha Vikask Aghadi
पण शरद पवार सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारात दिसत नाहीत. अर्थात त्यांच्यासारख्या सर्वांत ज्येष्ठ नेत्याने घासून आणि ठासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवाव्यात, विरोधकांना एकट्यानेच नेस्तनाबूत करावे, अशी त्यांच्यासारख्या 85 वयाच्या नेत्यांकडून अपेक्षाही नाही. पण ज्या पद्धतीने शरद पवार राष्ट्रीय पातळीपासून ते अगदी स्थानिक पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी राजकारणात लक्ष घालतात, ते पाहता सध्याच्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत ते तेवढे लक्ष घालत नाहीत ही बाब नजरेआड होत नाही. Maha Vikask Aghadi
त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा रोज बातम्यांमध्ये असले तरी ते प्रचारात अजून उतरलेलेच नाहीत. काँग्रेसचे नेतेही प्रचारापासून दोन हात दूरच आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे या स्वतःच एक “राष्ट्रीय नेता” असल्यामुळे त्यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये कुठले लक्ष घातलेले दिसत नाही. इतकेच काय पण बारामती आणि माळेगाव सारख्या घरच्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी समोर नांगी टाकून ती निवडणूक सोडल्यात जमा आहे. दोन्हीकडे त्यांनी युगेंद्र पवारांवर जबाबदारी टाकून आपल्या अंग झटकले आहे. रोहित पवार तर बारामतीकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यांनी आपले सगळे लक्ष जामखेड पालिकेवर केंद्रित केलेय. Maha Vikask Aghadi
बाकी व्होट चोरी वगैरे आरोप ठीक आहेत, पण महाराष्ट्रातले विरोधक कंबर कसून महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे वाभाडे काढण्यासाठी जनतेत गेलेत हे चित्र मात्र अजून उभे राहिलेले नाही.
त्यामुळेच शीर्षकात विचारलेला शरद पवारांनी अजून “हा” सवाल विरोधकांना का केला नाही??, असा सवाल त्यांना विचारायची वेळ आली.
– पवार म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय!!
ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळी ते शरद पवार यांना हवे तसे वागत नव्हते. शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कामांच्या फायलींवर ते सह्या करत नव्हते. त्यामुळे शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरपणे सवाल विचारला होता मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का??, ते विकास कामांच्या फायलींवर सह्या का करत नाहीत??, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी जिथे अयोग्य वाटते, तिथे सही करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे शरद पवार चिडले होते.
– विरोधकांना लकवा मारलाय का??
आज शरद पवारांच्या सकट विरोधकांची तशीच अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचंड बळापुढे महाविकास आघाडीला लकवा मारलाय. महाविकास आघाडीचे नेते गलितगात्र झालेत. त्यांनी निवडणुका लढवण्यासाठी त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत पण हाताशी “साधने” नाहीत. नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी स्वतःच्याच खिशात हात घालायची त्यांची तयारी नाही. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. कार्यकर्त्यांनी स्वतःचे करिअर उभे करण्यासाठी स्वतःच खर्च करून स्वतःच निवडणूका लढवायच्या तर लढवाव्यात. पक्षाला विजय मिळवून द्यावा आणि राजकीय बळ द्यावे. मग आम्ही त्या कार्यकर्त्यांच्या बळावर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांशी दोन हात करू, अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणूनच शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते प्रचारात कुठेच दिसत नाहीत. घेतली तर एखाद दुसरी सभा घेतात आणि पुन्हा आपल्या घरात जाऊन विसावतात. त्यामुळेच महाविकास आघाडीला लकवा मारलाय का??, असा सवाल खरंतर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने आघाडीतल्या इतर नेत्यांना विचारला पाहिजे, पण अजून तरी त्यांनी तो विचारल्याचे कुठे दिसले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App