महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा-शिवसेना या निवडणूकपूर्व युतीला भरघोस मतदान करत स्पष्ट बहुमताचा आकडा मिळवून दिला. मात्र त्यानंतर जनमताचा अनादर करत केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी शिवसेनेने निकालानंतर नवीच आघाडी केली. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या असंख्य शिवसैनिकांनी आयुष्यभर रक्त-घाम गाळून ज्या विचारांच्या विरोधात लढा दिला त्याच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रसेचा पाठींबा घेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची स्वतःकडे घेतली. यामुळे भाजपा-शिवसेनेत कडवटपणा आला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रीया महत्त्वाची मानली जात आहे. If Narendra Modi orders, we will have friendship with Shivsena too
विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विषय होता महाराष्ट्रापुढील समस्यांचा. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण हे देखील या भेटीस उपस्थित होते.
मात्र नंतर पवार-चव्हाणांना टाळून ठाकरे यांनी अर्धा तास पंतप्रधान मोदींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. या भेटीनंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघाताबद्दल आक्रमक असणारी महाराष्ट्र भाजपाने थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बुधवारी (ता. 9) पुण्यातल्या एका कार्यक्रमात वाघाचा पुतळा भेट मिळाला. त्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले की, आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले आहे.
फडणवीस आणि पाटील यांच्याशी त्यांचे जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. का ते माहीत नाही. पण इकडे महाराष्ट्रात जर वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते. आताही मोदींनी सांगितले तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल ते करू.
पण तसे काही घडलेच तरी निवडणुका ह्या स्वतंत्रपणेच लढवू, असेही पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असताना शिवसेनेचे मंत्री सातत्याने राजीनामे खिशात असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न करत. त्याची आठवण पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना करुन दिली.
पाटील म्हणाले, “राज्य सरकार 12 कोटी कोरोना लसी घेण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा एकरकमी चेक देणार होते. मात्र, नरेंद्र मोदी सरकारनेच आता 21 जूनपासून 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे सरकारचे सहा हजार कोटी रुपये वाचले आहेत.
मागच्या पाच वर्षांत खिशात आमदारकीचे राजीनामे घेऊन फिरणारे लोक ह्यावेळी 12 कोटी लसींच्या खरेदीचा सहा हजार कोटींचा चेक खिशात घेऊन फिरत होते. आता मोदींच्या निर्णयानंतर या सहा हजार कोटींचे काय करणार,” असा खोचक प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.
हे सहा हजार कोटी रुपये ठाकरे-पवार सरकार मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वापरणार की चक्री वादळात नुकसान झालेल्यांना वाटणार की कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या दुर्बल घटकांच्या खात्यात जमा करणार, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App