नाशिक : महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पदांच्या वादावर सातारा जिल्ह्यातील दरेगावी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना नेत्यांनी अपेक्षा बाळगण्यात गैर काय??, पण त्यामुळे सवाल निर्माण झाला, की अजितदादांना झुकते माप दिले म्हणून एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज झाले का??
महाराष्ट्रात पालकमंत्री पदांच्या वाटपाचा कारभार संबंधितांना सोपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला निघून गेले. पण नाराजी व्यक्त “न” करून एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावाला निघून आले. त्यांच्या नाराजीच्या बातम्या माध्यमांनी दिवसभर चालविल्या. पण त्यावर आपण नाराज नसल्याचा नेहमीचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. त्याचवेळी त्यांनी भरत गोगावले आणि दादा भुसे या आपल्या मंत्र्यांचे समर्थन केले. ज्या जिल्ह्यामध्ये या मंत्र्यांनी अनेक वर्षे काम केले, त्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे, अशी अपेक्षा बाळगण्यात गैर काय??, असा परखड सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यावर नंतर आम्ही तिघे एकत्र बसून तोडगा काढू, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या या वक्तव्यातून एक प्रकारे अजितदादांच्या राष्ट्रवादीला दणका दिला. कारण पालकमंत्री पदाच्या वाटपात संख्यात्मक पातळीवर जरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या नंबर वर असली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या नंबरवर असली तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुकते माप दिल्याचे “पर्सेप्शन” तयार झाले.
रायगड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त 1 आमदार असताना आणि एकनाथ शिंदे यांचे 5 आमदार असताना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिले गेले. रायगड जिल्ह्यातला राजकीय संघर्ष सुनील तटकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे नेते असा असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना डावलून सुनील तटकरे यांच्या कन्येला म्हणजेच आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने तटकरे यांचे रायगड जिल्ह्यावर परस्पर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना बिलकुल मान्य झाला नाही म्हणून भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे या नेत्यांनी उघडपणे संताप व्यक्त केला.
– पुणे जिल्ह्यातही नाराजी, पण…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना पुण्याचे पालकमंत्री केले. भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवारांना महायुतीत घेताना पुण्याच्या पालकमंत्री पदाचा त्याग केला होता. वास्तविक अजित पवारांना बीडचे पालकमंत्री पद दिल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री करण्याचे तसे कोणतेच कारण नव्हते. तरीदेखील अजितदादांचा पुणे जिल्ह्यावरचा वरचष्मा कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुण्याचे पालकमंत्री पद दिले हे भाजपच्या अनेक मंत्र्यांना आणि आमदारांना आवडले नाही. कारण त्यांनी पवार काका + पुतण्याच्या वर्चस्वाविरुद्ध वर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यात संघर्ष केला. पण भाजपच्या शिस्तीनुसार भाजपच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी उघडपणे त्यावर नाराजी व्यक्त केली नाही, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना झुकते माप दिल्याची बाब नजरेआड करता येण्यासारखी उरली नाही.
पालकमंत्री पदाच्या वाटपाच्या “या” राजकारणातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचा संताप बाहेर आला. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस वरून परत आल्यानंतर तोडगा निघणे अपेक्षित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App