विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रायगड येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “आता मला रिकामे ठेवू नका, मला काहीतरी जबाबदारी द्या,” असे मुंडे यांनी म्हटले होते. या वक्तव्यामुळे त्यांनी पुन्हा मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या विधानावर विरोधकांनी तीव्र टीका केली असून, आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मनोज जरांगे पाटलांचा टोला आणि इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देताना म्हटले, “रोजगार हमी योजनेच्या कामावर जा, खांदा टाक आणि काम कर.” त्यांनी पुढे सांगितले की, “हा माझा प्रश्न नाही, हा त्यांचा राजकीय आणि वैयक्तिक मुद्दा आहे.” तसेच, मराठा समाजाला त्रास झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा देत जरांगे म्हणाले, “मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादांचा राजकीय खेळ खलास होईल.”
छगन भुजबळांवरही हल्लाबोल
मनोज जरांगे यांनी याचवेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भुजबळ फुकटात जातींचा वापर करतात आणि स्वतःसाठी राजकीय मैदान मोकळे ठेवतात. गरीब समाजाचा गैरफायदा घेऊन त्यांना मोठा खेळ खेळायला मिळतो.” भुजबळांना उद्देशून ते पुढे म्हणाले, “ओबीसी आणि मराठा समाजाचे त्यांनी नुकसान केले आहे. त्यांना त्यांच्या पापांची फळे भोगावी लागतील. न्यायदेवता सर्वांसाठी आहे, फक्त त्यांच्यासाठी नाही. त्यांचा पापाचा घडा भरला आहे, आणि त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल.”
सुरेश धस यांचे सूचक उत्तर
धनंजय मुंडेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता, आमदार सुरेश धस यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघात सध्या पूरस्थितीमुळे गंभीर परिस्थिती आहे. मी येथे खराब झालेल्या जमिनीच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे आज यावर बोलणार नाही.” तथापि, त्यांनी पुढे सांगितले की, “पुढील दोन दिवसांत मी यावर खमंग आणि खुमासदार उत्तर देईन.”
अंजली दमानियांचा थेट हल्ला
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांना जनतेच्या कोणत्याही जबाबदारीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांनी आता मला रिकामे ठेवू नका, असे साकडे पक्षनेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडे घातले आहे. पक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षबांधणीची अनेक कामे उपलब्ध आहेत. त्यांनी ती कामे करावीत. पण, कोणत्याही परिस्थितीत त्यांना जनतेच्या कोणत्याही पदावर पुन्हा आणता कामा नये.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App